Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.
सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.
आजवर शोले, कहानी, तुंबाड सारख्या सिनेमांमध्ये जसं स्थळ आणि वातावरण सुद्धा कथा सांगतात, तसंच इथेही घुमट ही फक्त जागा नाही तो “अज्ञाताचा” प्रतिनिधी आहे. गावाबाहेर असलेलं हे ठिकाण म्हणजे समाजाच्या चौकटीबाहेरचं, आणि कदाचित मनाच्या मर्यादेबाहेरचंही. गावकऱ्यांना त्याचं अस्तित्व ठाऊक आहे, पण ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात कारण काही गोष्टी न जाणणंच सुरक्षित वाटतं.
सदाशिव आश्रय घेतो एका विधवा स्त्रीकडे; सावित्रीकडे. जी समाजापासून वेगळी आणि एकटी आहे. तिचं घर म्हणजे जणू मनाचा अंधारलेला, दडपलेला भाग. आणि सदाशिव संपूर्णपणे "बाहेरचा" असल्यामुळे त्या जगात प्रवेश करू शकतो.
सावित्रीच्या वागण्यातलं द्वंद्व त्याला लगेच जाणवतं. स्वच्छतागृहात पडलेलं मंगळसूत्र ती सहज उचलते. जणू लग्नसंस्थेचं पावित्र्य तिच्यासाठी उरलेलं नाही. उलट, पुढे तीच सदाशिवला “लग्न कर” असा सल्ला देते. इथे तिच्या मनातला संघर्ष दिसतो. स्वतःला अमान्य असलेली गोष्टही समाजमान्य उपाय म्हणून स्वीकारण्याची तिची तयारी अस्वस्थ करणारी आहे.
घुमटात दिसणारी गांधीजींची तीन माकडं “वाईट पाहू नका, ऐकू नका, बोलू नका” इथे प्रतीकात्मकपणे गावकऱ्यांचंच प्रतिबिंब आहेत. सगळ्यांना काहीतरी चुकतंय हे माहीत आहे, पण कोणी बोलत नाही, कोणी विचारत नाही, कोणी उघड करत नाही. सदाशिव मात्र याच्या उलट आहे, तो प्रश्न विचारतो, पाहतो, आणि शोध घेतो. आणि म्हणूनच तो भयाच्या अधिक जवळ जातो.
सिनेमात एक कुत्रा दिसतो पण तो फक्त सदाशिवलाच दिसतो. तो प्रत्यक्ष कुत्रा नसून, “instinct” किंवा “आंतरिक सत्यशोधक प्रवृत्ती” याचं प्रतीक वाटतो. गावाच्या वेशीवर तो थबकतो , जणू त्या जागेतील दडपलेल्या ऊर्जेला तो ओळखतो. सावित्री त्याला घरात घेत नाही, कारण सत्याला सामोरं जाण्याची तिची तयारी नसते.
दुसऱ्या दिवशी त्याच कुत्र्याचा सांगाडा सदाशिवला सापडतो. जणू त्या instinct चं अस्तित्वच संपलं आहे. कदाचित तो सुरुवातीपासूनच वास्तव नव्हता, तर सदाशिवच्या मनाचं projection होता.
रात्री सातनंतर गावात एक वेगळंच जग उघडतं. एके दिवशी ती वेळ उलटूनही सदाशिव घरी येत नाही, येतो पण सावित्री त्याला घरात घेत नाही, वरून कानात बोळे घालून झोपते, ते आवाज टाळण्यासाठी नव्हे, तर जाणीवपूर्वक वास्तवापासून disconnect होण्यासाठी. तिच्या दारावर दिसणाऱ्या तिच्याच तरुणपणीच्या छबी तिच्या अपूर्ण राहिलेल्या आयुष्याच्या, दडपलेल्या इच्छा-आकांक्षांच्या सावल्या आहेत.
सिनेमातली अनेक दृश्यं अत्यंत प्रभावी प्रतीकात्मक आहेत.
दाराबाहेर ठेवलेलं अन्न, सकाळी रिकाम्या ताटल्या, त्यावरचे लाल-चिकट डाग हे सगळं जणू आपणच आपल्या दडपलेल्या इच्छा, वासना, भीती यांना पोसत असल्याचं रूपक आहे. त्या गोष्टी बाहेरून येत नाहीत, त्या आपल्या आतच वाढतात.
एकीकडे सगळं जग मातकट, कळकट रंगात दिसतं, तर हिरव्या साडीतली छोटी मुलगी वेगळीच भासते ,कदाचित निरागसतेचं, किंवा अजून न दूषित झालेल्या अस्तित्वाचं प्रतीक.
हा सिनेमा सरळ कथा सांगत नाही तो असंख्य प्रश्न विचारतो:
भीती ही दिसणाऱ्या गोष्टीत नसते… ती न समजणाऱ्या गोष्टीत असते.
AI visuals थोडे off, स्वप्नवत वाटतात पण नेमकं तेच या कथेला पूरक ठरतं. हा सिनेमा एक कथा म्हणून स्पष्ट दिसत नाही तो अनुभवावा लागतो आणि मनाने उलगडावा लागतो.
“माणूस बाहेरच्या अंधाराला घाबरतो… पण खरा अंधार त्याच्या आत असतो.”
हा सिनेमा म्हणजे गोष्ट नाही एक psychological Thrilling Experience आहे.
जरूर बघा.
*********************************************************************

