वाडा (कथा)

आत्याच्या घरची उन्हाळी सुट्टी म्हणजे चंगळच. किती ते हुंदडणं, आंबे, फणस, चापणं, आजुबाजुची मुले जमवून समुद्रकिनारी वाळूत किल्ले करणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्याचे लाड करणं. तिच्या हातचे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचं आंबट - तिखट कालवण.... अहाहा स्वर्गसुख ! सुमीतच्या तोंडाला या आठवणीनेच पाणी सुटलं. आता मनसोक्त लाड करुन घ्यायचे आत्याकडून.....आत्या...तिची मायेने ओथंबलेली नजर आजही तशीच डोळ्यांसमोर येते सुमीतच्या. आत्याला रागावलेली तर नाहीच पाहिलं कधी पण तिचा कधी आवज चढलेलाही सुमीतला आठवत नाही. शांत स्वभावाची, हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची आत्या, साधी राहणी, नेसणं साधं, कधी कोणाबद्द्ल उणाअधिक शब्द हिच्या मनात तरी आला असेल का? याची शंका यावी इतकं आत्मीयतेनं वागणं-बोलणं. या शांत चेहर्‍यामागे भावभावनांची किती स्थित्यंतरं लपली होती हे त्या लहान वयात सुमीतला कळण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला एक कारण होतं आत्याला विचलित झालेलं बघायला आणि ते म्हणजे गावाबाहेरचा ‘देसाई वाडा’. त्या वाड्याचं नाव जरी आत्याच्या समोर कोणाच्या तोंडून निघालं तरी तिच्या जीवाची घालमेल होई.

लेख: 

वाडा (कथा) : भाग १

वेळेवर बस पणजी डेपोतुन सुटली आणि रत्नागिरीच्या दिशेने धावू लागली. सुमीत खिडकीजवळच्या सीटवर निवांत बसला होता. सहा ते साडे सहा तासाच्या प्रवासात टाईमपास करायला त्याने बर्‍याच मूव्हीज अपलोड करुन ठेवल्या होत्या.लॅपटॉप ऑन करत असतांनाच त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. आज जवळजवळ पाच-सहा वर्षांनी तो आत्याकडे रत्नागिरीला चालला होता. वर्ष किती झरझर निघून गेली. कॉलेजात जायला लागल्यापासून त्याला रत्नागिरीत जायला जमलेच नव्हते. मात्र आई-वडीलांकडून आत्याची खबरबात मिळत होतीच. शेवटच्या वर्षाची परीक्षा आटोपली आणि जरा मोकळा वेळ हाताशी मिळाला की आत्याकडे नक्की जायचे असे मनाशी पक्के केले होते सुमीतने. ठरवल्याप्रमाणे आज सुमीत निघाला होता. आत्याची आठवण येताच सुमीत पिक्चर बघायचे विसरुन त्याच्या बालपणीच्या आत्याकडे घालवलेल्या सुट्टीतल्या रम्य दिवसांत गढून गेला.

आत्याच्या घरची उन्हाळी सुट्टी म्हणजे चंगळच. किती ते हुंदडणं, आंबे, फणस, चापणं, आजुबाजुची मुले जमवून समुद्रकिनारी वाळूत किल्ले करणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्याचे लाड करणं. तिच्या हातचे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचं आंबट - तिखट कालवण.... अहाहा स्वर्गसुख ! सुमीतच्या तोंडाला या आठवणीनेच पाणी सुटलं. आता मनसोक्त लाड करुन घ्यायचे आत्याकडून.....आत्या...तिची मायेने ओथंबलेली नजर आजही तशीच डोळ्यांसमोर येते सुमीतच्या. आत्याला रागावलेली तर नाहीच पाहिलं कधी पण तिचा कधी आवज चढलेलाही सुमीतला आठवत नाही. शांत स्वभावाची, हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची आत्या, साधी राहणी, नेसणं साधं, कधी कोणाबद्द्ल उणाअधिक शब्द हिच्या मनात तरी आला असेल का? याची शंका यावी इतकं आत्मीयतेनं वागणं-बोलणं. या शांत चेहर्‍यामागे भावभावनांची किती स्थित्यंतरं लपली होती हे त्या लहान वयात सुमीतला कळण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला एक कारण होतं आत्याला विचलित झालेलं बघायला आणि ते म्हणजे गावाबाहेरचा ‘देसाई वाडा’. त्या वाड्याचं नाव जरी आत्याच्या समोर कोणाच्या तोंडून निघालं तरी तिच्या जीवाची घालमेल होई. दिवसभर कितीही उंडारा मात्र त्या वाड्याच्या सावलीलाही कधी जायचे नाही अशी सक्त ताकीदच होती आम्हा मुलांना. केवळ आत्याकडूनच नाही तर गावातल्या सगळ्या मोठ्यांकडून होती म्हणा ना. वाढत्या वयात फुशारक्या मारायला आम्ही कित्येकदा आत्याला देसाई वाड्याच्या आसपास जातो असे मुद्दाम बोलून चिडवत असू.त्या प्रत्येक वेळेस ती बिचारी गयावया करुन आम्हाला रोखत असे. तसंही आत्याचा शब्द त्या गावात कोणीही खाली पडू देत नव्हतंच.

हा 'देसाई वाडा' खरं तर प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा ठिकाणीच होता. गावात येणार्‍या माणसाला हा वाडा टाळून जाणं शक्यच नव्हतं. दुसरी वाटच नव्हती. हायवेपासून चाफे गावचा फाटा सुरु झाला की अर्ध्या-एक मैलावर असेल हा वाडा. त्याला बगल देऊनच पुढे एक पाऊलवाट गावात जाई. त्यामुळे वाडा टाळून जाणे शक्यच नव्हते. आजही आठवत होतं सुमीतला, लहानपणी त्या वाड्यावरुन जाताना 'रामनाम' जपत धडधडत्या काळजाने आईचा हात धरुन जात असे तो. प्रत्येक वेळेस तिथून जाताना छातीत होणारी धडधड त्याच्याच काय, आईच्याही होत असावी. कारण आई नेहमी हाताला धरुन ओढायाचीच त्या ठिकाणी पोचल्यावर. तिलाही लवकर तिथून लांब जायचं असायचं. तिन्हीसांजेची वेळ असेल तर अंधार पडू लागला असायचा. आजुबाजुला गर्द झाडी आणि रातकिड्यांची किरकिर. ती मोठाली झाडंही भकासपणे बघतायत असं वाटायचं. कधी कोणी पाठलाग करतंय, आपल्यावर नजर रोखून बघतंय असे विचित्र भास होत असत सुमीतला. त्याने कधीच यातलं काही आईला किंवा इतर कोणालाही सांगितलं नव्हतं.मनात भिती असली तरी एखादा चोरटा कटाक्ष वाड्यावर टाकल्याशिवाय चैन पडायचे नाही सुमीतला.त्या एका दॄष्टीक्षेपात काय जे दिसेल ते मनात साठवून ठेवलं होतं त्याने. नीटस चौसोपी असा दगडी वाडा होता तो. मागे-पुढे अंगण, जिथे नुसतं तण माजलं होतं. परसदारी गडग्यावरुन गेलं की विहीर. सारी खिडक्या, दारे कायम बंद, दगडी चिरांमधून वाढलेलं शेवाळ, तर कुठे उगवलेलं पिंपळाचं रोप हा वाडा कैक वर्षे ओसाड पडून असल्याचे सांगत होता.

वाड्याला बगल देऊन पुढे येताच जिथे गावाची वेस सुरु होते तिथे हनुमानाच्या नावानं एक शिळा स्थापन केली होती गावकर्‍यांनी. भोवताली पार बांधला होता. स्थापनेचा सोहळा सुमीतला चांगलाच आठवत होता. वाड्यातल्या ‘पिशाच्चापासून’ गावाचे रक्षण करण्यासाठी गावच्या भगताने काही उपाय केले होते. ही 'हनुमंताची शिळा' त्यांपैकीच एक उपाय. का कुणास ठाऊक पण त्या हनुमान पाराशी पोचलं की हायसं वाटू लागायचं. पोचलो एकदाचे सुखरुप असं 'हुश्श' करणारं फिलिंग यायचं. सुमीतच्या आठवणीत त्यांनी कधीच दुपारनंतरची एस टी पकडली नव्हती. दिवसाउजेडी, फार फार तर संध्याकाळी गावात पोचेल अशी वेळ साधूनच एस टी पकडत असत ते. पण जर कधी क्वचित कोणावर रात्री-बेरात्री त्या वाटेने गावात जाण्या-येण्याचा प्रसंग आलाच तर त्या व्यक्तीची चांगलीच तंतरायची. एका-दोघांनी तर रात्री त्या वाड्यात हडळ फिरतांना पाहिली होती म्हणे आणि मग तापाने फणफणले बिचारे. भगताने किती उतारे-पातारे केले तेव्हा कुठे बरं वाटू लागलं होतं त्यांना.

बसने अचानक ब्रेक मारला आणि सुमीत तंद्रीतून जागा झाला. हसला स्वतःशीच . कोकणी घरं, जुने वाडे आणि त्यांत सुखेनैव नांदणारी ‘भूतं’ हे समीकरण तर कित्येक वर्षांपासून आहे तसंच आहे. प्रत्येक अंगणात डोलणार्‍या माडाच्या झावळ्या, कानावर पडणारी समुद्राची गाज, भरपूर झाडं झुडपं त्यामुळे अंधारी घरं, रातकिड्यांची किरकिर, फार पूर्वी, लाईटसही नव्हते तेव्हा ही सारी परिस्थिती भुताखेताच्या सांगोवांगी अनुभवांसाठी पोषक होती. पण आज....प्रत्येक घरात वीज पोचली असतांना, शिक्षणाचे - प्रगतीचे वारे वाहत असतांनाही या छोट्याशा गावात आजमितीलाही 'देसाई वाडा' मात्र भुतांनी पछाडलेलाच होता. का असं? या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे जसं मला मोठं झाल्यावर वाटू लागलं तसं त्या गावात अजुन कुणालाही वाटत नाही? आणि वाटत असल्यास ते बदलण्याचा प्रयत्न का केला गेला नाही इतकी वर्षं? आजही घरुन निघतांना आईने देसाई वाड्याच्या अवतीभवती जायचं नाही हे निक्षून सांगितलं होतंच.

थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदिराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला? काय आहे त्यामागे रहस्य? एकंदर 'देसाई वाडा' एक गूढतेचे वलय स्वतःभोवती बाळगून होता, गेली अनेक वर्षे !!!

क्रमश:

भाग २

Keywords: 

लेख: 

वाडा (कथा): भाग २

थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदीराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला? काय आहे त्यामागे रहस्य? एकंदर देसाई वाडा एक गूढतेचे वलय स्वतःभोवती बाळगून होता, गेली अनेक वर्षे !!!

हा वाडा गावच्या जमीनदारांच्या मालकीचा. देसाई नाव त्यांचं. त्यांच्या नावेच ओळखला जायचा. हे जमीनदार म्हणजे आत्याचे सासरे. आपल्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आत्याशी जमलं तेव्हा लेकासाठी आणि सुनेसाठी मोठ्या हौसेने हा वाडा त्यांनी खास बांधून घेतला. लग्न झाल्यावर नवं जोडपं या वाड्यातच राहणार होतं. तर जमीनदार आणि त्यांची पत्नी गावात मध्यवर्ती भागात स्वतःच्या वडीलोपार्जित घरात रहात असत. देसाई घराणं मोठं प्रस्थ. त्यामानाने आत्याच्या माहेरची परिस्थिती बेताची, आत्याचे वडील म्हणजे सुमीतच्या वडीलांचे काका अनेक वर्षं देसायांकडे चाकरी करीत असत. गरीबाची एकुलती एक आईविना असलेली, सोज्वळ, नाकी डोळी नीटस पोर-म्हणजे राधा- सुमीतची आत्या, देसाई पती पत्नीला मनापासून आवडत होती. आपल्या मुलाची संमती घेऊन देसाई पती-पत्नींनी राधेला मागणी घातली आणि सोनं झालं तिच्या आयुष्याचं. सोनपावलांनी या राधेनं देसाई वाड्यात गृहप्रवेश केला.

सुमीतला जे सांगितलं गेलं होतं ते म्हणजे आत्याचे लग्न लागताच वरात त्या नव्या वाड्यात आली. फुलांची आरास आणि दिव्यांची रोषणाई यांनी सज्ज होऊन देसाई वाडा नव्या नवरीचे स्वागत करण्यास दिमाखात उभा होता. वरात आली. पाहुणे मंडळींच्या जेवणावळी होऊन संध्याकाळनंतर मंडळी पांगली. घरची चार माणसं तेव्हढी राहिली. मध्यरात्री अचानक राधेची आर्त किंकाळी ऐकून देसाई बाई धावत बघायला आल्या तर ....तर त्यांचा तरणाताठा लेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि राधा त्यांच्या डोळ्यांदेखत भोवळ येऊन पडली. काही तासांपूर्वी जो वाडा लग्नघर म्हणून सजला होता त्यावर मॄत्यूचे तांडव थैमान घालू लागले.

थोरल्या मालकांनी आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या मागच्या अंगणातून काळोखात कुणीसे पळून जाताना दिसले. चौकशीअंती असे लक्षात आले की गावाबाहेरच्या जंगलात एक लुटारुंची टोळी काही दिवसांपूर्वीपासून सक्रीय होती. आजूबाजूच्या गावांत, घरात घुसुन चोर्‍या, दरोडे असे प्रकार झाले होते. त्यांनीच डाव साधला असावा, राधेचे दागिनेही मिळत नव्हते. देसाई म्हणजे मोठं प्रस्थ असल्यामुळे काही दिवसांतच त्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. राधेचे दागिनेही पोलिसांच्या हाती आले आणि त्या टोळीने गुन्हा कबुल केल्याचे पोलिसांकडून देसायांना सांगण्यात आले.मात्र राधेच्या मनावर झालेला हा आघात कोणालाही मिटवता आला नाही. ती कित्येक दिवस शॉकमध्ये होती. थिजुन गेल्यागत ती एकटक तासंतास बघत बसे.

या आघातानंतर मात्र सारंच चित्र बदललं. हौसेने केलेली मुलगी सून म्हणून ज्या दिवशी घरात आली त्याच दिवशी तिच्या वाट्याला असं वैधव्य यावं हा केवढा दैवदुर्विलास. पण नातलगांनी कान भरले म्हणून किंवा इतर काही कारणाने थोरल्या जमीनदार बाईंनी सुनेचं नावच टाकलं आणि त्या नव्या वाड्याचंदेखील. सून नजरेसमोर नकोशी झाली सासूला. काही दिवस वडीलांनी माहेरी गावाला नेलं. पण वडील थकले होते. ते कितीसे पुरणार तिला? राधेची काही कायमची सोय लावणं आवश्यक होतं. थोरले जमीनदार भला माणूस. त्यांनी वचन दिलं राधेच्या वडीलांना की मी सांभाळेन हिला. विठू आणि रखमा हे वाड्यावर चाकरी करणारं जोडपं. या जोडप्याला त्यांच्या आठ-नऊ वर्षांच्या मुलासह या नव्या वाड्यात राधेच्या सोबतीला ठेवून घेतलं. राधेच्या नावानं मोठी रक्कम बँकेत जमा केली आणि त्याचं व्यवस्थित व्याज तिला मिळेल हे सर्व पाहून स्वतः मात्र पत्नीसह तालुक्याच्या गावी असलेल्या त्यांच्या दुसर्‍या घरी राहू लागले.

राधा हळूहळू दु:खातून सावरु लागली. तिनं मन रमवण्यासाठी स्वतःला अनेक कामांत जुंपून घेतलं. लोकांच्या अडीअडचणीला धावून जावू लागली. वेळप्रसंगी पैशांची मदत करु लागली. थोडीफार शिकलेली असल्यामुळे गावकर्‍यांना शिक्षणाचं मह्त्व पटवून देत मुलांना शाळेत पाठवणे, महिलांना आरोग्यविषयक माहिती देणे, त्यांना एकत्र करुन शिवणकाम, विणकाम शिकवणे असे करता करता दिवस सरत होते. हळूहळू राधा गावकर्‍यांची लाडकी वहिनीसाहेब झाली. पांढरी सुती साडी, कोपरापर्यंत ब्लाऊज,लांबसडक केसांचा अंबाडा असा तिचा साधा वेश. सुमीतने आत्याला या पोशाखातच कायम पाहिली होती. अंगावर एकही दागिना नाही. चेहरा मात्र मायेने ओतप्रोत भरलेला. तोच काय तो तिचा दागिना.हेच धन ती सार्‍यांवर उधळत असे. गावात सर्वांना तिची कर्मकहाणी माहीत होती. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे तिने अनेक माणसं जोडली. सारेजण तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल मात्र हळहळ व्यक्त करीत असत.

सासरे अधुन मधुन चौकशीसाठी येत. गावातल्या वाड्यात उतरत. त्यामुळे राधाने हा वाडाही नीट सांभाळला होता. रखमाला हाताशी घेऊन त्याची दररोज झाडलोट ती करुन घेत असे. पण ते सासू -सासर्‍यांचे घर म्हणून. ती स्वतः तिथे कधीही राहिली नाही.
हा गावाबाहेरचा नवा वाडाच तिला आपला वाटत असे. रख्मा आणि विठुचा मुलगा सदा. त्याच्याशी खेळायला म्हणून वाड्यात बरीच मुलं येत असत. त्या सर्वांशी राधा खूप आपुलकीने वागत असे. सदा तर तिचा जीव की प्राण होता. हे विठूचं कुटुंब वाड्यातच परसदाराजवळ असलेल्या शेवटच्या खोलीत रहात असे. पण त्या दिवशी सदाने राधाक्काच्या खोलीत तिच्या जवळच झोपायचा हट्ट केला. किती समजावले तरी ऐकेचना तो रख्मेचं. राधानेच समजावले तिला की “अगं झोपू देत की त्याला इथे काय बिघडलं त्यात?” म्हणून मग त्याला राधाच्या खोलीत झोपवून विठू आणि रख्मा आपल्या खोलीत गेले. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून रख्मा कामाला लागली. राधा उठून खोलीबाहेर आली आणि रख्माला बोलली "काय मग शेवटी रात्री आईची आठवण आलीच ना सदाला? कधी आला तुझ्याजवळ? मला समजलेच नाही बघ." रख्माने ऐकले मात्र ती डोळे विस्फारुन वहिनीसाहेबांकडे बघतच राहिली. "सदा....? माझ्याजवळ....नाही.. आला..." रख्मा थरथरत तुटक तुटक बरळली. राधेच्या तर पायाखालची जमीन सरकली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच तिघांनी मिळून सदाला आजुबाजूला सगळीकडे शोधले, हाका मारल्या. पण नाहीच मिळाला तो. आता गावात जाऊन शोधुयात असा विचार करत विठू परसदारी विहीरीपाशी गेला. सहज म्हणून आत डोकावून पाहिले....आणि...सदाSSSSS अशी आर्त किंकाळी देसाई वाड्यात घुमली. विहीरीत सदाचे प्रेत तरंगत होते ............. ते पहाताच आत्या भोवळ येऊन पडली.

सदा रात्रीच्या वेळेस उठून बाहेर विहीरीपाशी का नि कसा गेला? आत कसा पडला? तो उठल्याचे राधेला कसे समजले नाही? या सार्‍या प्रश्नांची उकल कोणालाही करता आली नाही. अपघाताने विहीरील पडून मृत्यू असे नोंदवून पोलिसांनी केस बंद केली.केवळ एका गोष्टीवर एकमत झालं, देसाई वाड्याने दुसरा बळी घेतला !!!

हा प्रसंग घडला आणि गावाला एक ‘हाय अॅलर्ट’ मिळाला जणू देसाई वाड्याबद्दल. या वाड्यातच काही भानगड आहे. राधाच्या सासरेबुवांना पाचारण केले गेले. गावचे पाटील, जमीनदार, शाळा मास्तर अशी प्रतिष्ठीत मंडळींची बैठक झाली आणि सर्वानुमते या वाड्यातच काहीतरी दोष आहे यावर शिक्कामोर्तब झाले. राधेशी बोलून देसाईंनी तिचे सामान गावातील घरात हलवले आणि देसाई वाड्याला टाळं लागलं ते आजतागायत.

राधा घडल्या प्रकाराने अंतर्बाह्य हादरली होती. पती निधनानंतर ती जशी शॉक मध्ये होती तशीच यावेळीही तिची परिस्थिती झाली, किंबहुना या वेळी तर तिच्या मनावर झालेला आघात फार मोठा होता. दुसर्‍याच्या पोराला आपल्या खोलीत झोपू दिलं काय आणि रात्री ते पोर गेलं?? आपल्याला कानोकान खबर नाही... हे फार लागलं राधेच्या मनाला. सदाचे दिवस कार्य झाले आणि थोरल्या मालकांनी विठु - रखमाच्या दु:खावर फुंकर घालण्याचा एक क्षीण प्रयत्न म्हणून त्या जोडप्याला बर्‍यापैकी पैसे दिले जेणे करुन त्यांना कष्टाने गुजराण करावी लागू नये. रख्मा, विठू दोघांनी नोकरी सोडून आपल्या मूळ गावी जायचा निर्णय घेतला. देसाईंना मान्य करावाच लागला तो निर्णय. तसंच राधेनंही एक निर्णय घेऊन टाकला, " मी यापुढे वाड्यात रहणार नाही. मंदीरात व्रतस्थ जीवन जगेन". हा धक्का होता खरंतर सासरेबुवांसाठी. पण सुनेच्या मनाचा विचार करणेही महत्वाचे होते. सदाचे असे जाणे तिला चटका लावून गेले आहे. शिवाय आपल्या पत्नीने तिला स्वीकारले नसल्यामुळे ती आपल्या घरात रहायला येत नसावी हेही कारण होतेच. गावदेवीच्या मंदीरात दोन खोल्या मंदीरातील अतिरिक्त सामान ठेवण्यासाठी राखून ठेवल्या होत्या. त्या भाडेतत्वावर घेऊन राधाची सोय सासरेबुवांनी मंदीरात केली.

यापुढे राधा त्या दोन खोल्यांत एकटी राहू लागली. कोणालाही सोबतीला ठेवायचं नाही हे ठरवूनच टाकलं तिने. सुमीतचं कुटुंब सुट्टीत कधीतरी येत असे तेव्हढीच काय ती सोबत. पण राधेच्या घरात जागा कमी त्यामुळे ते रात्री वस्तीला इतर ओळखीच्या कुटुंबात जात असत किंवा मंदीरातच झोपत असत.हळूहळू राधाने गावातील बायकांचा बचतगट चालू केला. शिवणकाम, विणकाम करुन बनवलेले कपडे इतर वस्तू या महिला विकत असत. त्यांतून त्यांच्या हाती पैसा खेळू लागला. राधेलाही ही स्वकष्टाची कमाईच बरी असे वाटत होते. सासर्‍यांनी दिलेले पैसे ती त्यांचा मान राखायला घेत असे पण ते गावात इतरांच्या अडल्या नडल्या वेळेस वापरत असे. तिचा एकटीचा असा खर्च तरी कितीसा असणार?

ही होती कहाणी देसाई वाड्याची. तीन महिन्यांमध्ये झालेले दोन मॄत्यू हे केवळ एकमेव कारण होतं देसाई वाड्याबद्दल निरनिराळ्या वदंता उठायला. मॄत्यू कोणाच्या घरात होत नाहीत? म्हणून काय अख्खं घरच भुताटकीने झपाटलेलं ठरवून ते सोडून जातं का कोणी? आणि तसंही काकांवर हल्ला झाला तेव्हा हल्लेखोर बाहेरुन आले होते. म्हणजे फक्त सदाचा संशयास्पद स्थितीत झालेला मृत्यू. त्याच्या मॄत्यूची शहानिशा होणं भाग होतं खरंतर. त्यामागचं कारण समजलं असतं तर आपली आत्या बिचारी अशी निर्वासितासारखी राहिली नसती. या देसाई वाड्यातच मानाने राहिली असती. कोणीतरी हे मुद्दाम घडवून आणलं असावं का? का पण? कशासाठी? आत्याशी कोणाचं बरं वैर असावं? की दुसरा काही अंतस्थ हेतू असावा? कसे कळणार यामागील रहस्य? इथे रहाणार्‍या कोणाला तरी हाताशी घेऊन सार्‍या घटनांची उजळणी त्या व्यक्तीकडून करुन घ्यायला हवी. तरच कळेल काही धागेदोरे सापडतायत का? खरंतर आईशी अनेकदा या विचारावर बोलणं, नव्हे वादच झाले होते सुमीतचे. त्यांचं म्हणणं एकच होतं. पुन्हा त्या वाड्यात रहायला जाऊन विषाची परीक्षा का करा? जे झालं ते आत्याचं नशीब, यापुढे काळजी घ्यायला हवी आणि तू या भानगडीत मुळीच पडायचे नाहीस. साहजिकच होतं म्हणा. आईला काळजी वाटणारच. आपलं लेकरु या साहसकथांच्या नादापायी कुठे गोत्यात नको यायला याची. पण सुमीतचे बाबा मात्र त्याला समजून घेत असत. वयानुसार त्याच्या मनात उद्भवणारे वाड्याबाबतचे कुतुहल ते त्यांच्या परीने उत्तरं देऊन शमवायचा प्रयत्न करीत. घरी असतांना तो कैकदा मी हे वाड्याचे गूढ उलगडायला रत्नागिरीला जाईन असे म्हणताच आई खेकसत असे त्याच्या अंगावर. पण बाबा तिला शांत करीत असत. आपला मुलगा बुद्धिमान आहे, तो जे करेल ते विचारपूर्वकच, आततायीपणा तो करणार नाही असे ते आईला समजावत असत. सुमीतला पण बाबा म्हणजे आपला भक्कम आधार होता. सुमीतने मनाशी ठरवून टाकले होते की या प्रकरणाचा छडा लावायचाच. म्हणूनच तर तो निवांत वेळ काढून आत्याकडे आला होता. देसाई वाड्यात (न) राहणार्‍या भुतांचा बंदोबस्त करण्यासाठीच.

सुमीतने चटकन लॅपटॉपवर नोटस काढायला सुरुवात केली. एक स्ट्रॅटेजी प्लॅन करणे आवश्यक होते. या कामात कोण मदतीला येऊ शकत होते? सर्वांत आधी डोळ्यांसमोर आले आत्याचे नाव. पण आत्या करेल का काही मदत? की तिला त्रास होईल याचा? तिला दुखवून काही करायचे नाही. तिचा कल पाहून गोडीगुलाबीने तिच्याशी बोलत काही समजतंय का याचा सर्वप्रथम अंदाज घ्यावा. हा प्लॅन ए. हा जर वर्क आउट झाला तर नथिंग लाईक इट. पण याचे चांसेस फिफ्टी पर्सेंट. जर हे नाही जमलं तर....प्लॅन बी काय असेल? कोण मदत करु शकतो? सुमीत विचाराधीन झाला. लहानपणी आपण इथे यायचो तेव्हा आजुबाजुच्या कितीतरी मुलांशी आपली मैत्री झाली होती. त्यांतील काही गाव सोडून गेली असतील. पण कोणीतरी असेलच गावात. त्यांपैकी एकाला गाठायचे. या नव्या पिढीला हाताशी घेणं बरं पडेल. त्यांचे विचार तरी समजतील या बद्दलचे. सुमीतचा आराखडा तयार होत होता. कोणाची तरी मदत, परवानगी मिळवून देसाई वाड्यात प्रवेश करायचा... इतकं जरी करता आलं तरी खूप झालं. पुढचं पुढे.

तेव्हढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. बस एक आचका देत थांबली. पाठोपाठ कंडक्टरचा आवाज "चाफे फाटा". चला सुमीतराव "मिशन देसाई वाडा कॉलिंग.... यो..."

क्रमशः

भाग ३

Keywords: 

लेख: 

वाडा (कथा): भाग ३

तेव्हढ्यात कंडक्टरने बेल वाजवली. बस एक आचका देत थांबली. पाठोपाठ कंडक्टरचा आवाज "चाफे फाटा". चला सुमीतराव "मिशन देसाई वाडा कॉलिंग.... यो..."

सुमीत आपली सॅक सावरत बसमधून उतरला. रस्ता क्रॉस करुन गावाकडे चालू लागला. इतक्या तासांचा प्रवास करुन आला असूनही शीण जाणवत नव्हता त्याला, उलट छान प्रसन्न वाटत होते. लहानपणीच्या ओळखीच्या खूणा त्याला दिसत होत्या. बरंच काही तसंच होतं. फार बदल झाले नव्हते गावात गेल्या पाच-सहा वर्षांत. काही मिनिटे चालून गेल्यावर तो थबकला एक क्षणभर. डाव्या अंगाला देसाई वाडा नजरेस पडला. एक अनामिक अशी भितीची लहर अंगातून चमकून गेली, पण क्षणभरच. लगेच सावरले त्याने स्वतःला. मुद्दाम चालण्याची गती अगदी मंद करीत तो रमत गमत वाडा निरखू लागला. वाडा तसाच उदास, भकास, केविलवाणा भासत होता.अंगण होते की नाही असा संशय यावा इतकी झुडपं वाड्याभोवती वाढली होती. वाड्याच्या आत आणि बाहेर कुठेही कोणाचाही मागमूस त्याला लागला नाही, कसलीही हालचाल जाणवली नाही. भुताला बहुदा समजले असावे की मी येतोय त्यांचा खात्मा करायला आणि आधीच पसार झाले ते, स्वतःशीच मिश्किलपणे हसत तो पुढे जाऊ लागला. वळणावरचा मारुतीचा पार लागला.तिथून मागे वळून परत एकदा त्याने वाड्यावर नजर टाकली आणि झपाझप पावले टाकीत चालू लागला.

दिवेलागणीच्या सुमारास सुमीत गावात पोहोचला. आत्या मंदीराच्या गाभार्‍यात दिवा लावत होती. मंदिरातला तो शांत नितळ प्रकाश, उदबत्तीचा मंद सुवास, मूर्तीवरची ताजी फुलं सगळं कसं प्रसन्न वातावरण होतं.आत्या वळली नि समोर सुमीतला पाहताच धावतच सामोरी आली त्याच्या स्वागताला. तोच हसतमुख, शांत चेहरा, पांढरी सुती साडी, डोळ्यांखाली काळी वर्तुळे. "ये ये सुम्या, ये, कसा झाला प्रवास?" अशी त्याची विचारपूस करत आत्याने त्याचे स्वागत केले. चहापाणी झालं, ख्याली खुशाली विचारुन , सांगून झाली. सुमीत जरा गावात पाय मोकळे करुन येतो असे म्हणत घराबाहेर पडला.

गावात भटकत असतांना सुमीतला जाणवले की गावात फारसे बदल झालेले नाहीत. ठराविक पठडीतलं आयुष्य जगणारी ही माणसं, म्हणूनच कोणतेही बदल चटकन स्वीकारणार नाहीत. आपल्याला आपले काम फार निगुतीने करावे लागेल. लहानपणापासूनच सुमीतला रहस्य,गूढ कथा वाचायला त्यावर आधारीत सिनेमे बघायला भारी आवडत असे. त्यातील रहस्याची उकल हिरोने कशी केली ? काय काय शक्यता विचारात घेतल्या यावर तो नेहमी विचार करत असे. हेच कारण असावं देसाई वाडा त्याला आकर्षित करीत होता स्वतःबद्दलचे गूढ सोडवायला. त्या रहस्य कथांत लिहिल्याप्रमाणे ती जी घटना घडली असते त्या वेळची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती यांचे बारकाईने निरीक्षण, विचार करणे आवश्यक असते. सुमीत त्याबद्दलच विचार करीत चालत होता.अचानक एक युवक त्याला सामोरा आला आणि त्याच्याकडे रोखून बघू लागला. "ए तू, तू सुम्या का? वहिनीसाहेबांचा गोव्याचा भाचा?" सुमीतने रोखून पाहिले "अरे मुकुंदा?" होकारार्थी मान डोलवत त्याने स्वतःची ओळख पटवली आणि दुसर्‍याच क्षणी कडकडून सुमीतला मिठी मारली.

मुकुंद म्हणजे गावच्या पाटलांचा मुलगा, साधारण सुमीतच्याच वयाचा. सुमीत सुट्टीत इथे आला की दोघे एकत्र खेळायचे. दोघांची छान गट्टी होती. मुकुंदाने आय टी आयचा इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला होता. आजुबाजुच्या गावांतून त्याला लहान मोठी कामे मिळत असत.

मुकुंदा इथे गावातच राहतोय हे समजतांच सुमीतला अर्धा गड जिंकल्यागत झाले. एकतर तो त्याचा खास बालमित्र होता आणि दुसरे असे की त्याचे वडील गावचे पाटील होते. उद्या देसाई वाड्याबाबतीत काही कमी जास्त झालं तर गावकर्‍यांचा विरोध मॅनेज करायला असा पॉवरफुल माणूस आपल्या बाजूने असणं ही जमेची बाजूच होती.

मुकुंदाला उद्या निवांत भेटून बोलुयात असे सांगून सुमीत घरी आला. आत्याने त्याच्यासाठी बांगड्याचं कालवण आणि तांदळाची भाकरी असा फक्कड बेत केला होता. सुमीत मजबूत जेवला. आत्याही प्रेमाने आग्रह करकरुन वाढत होती त्याला. जेवणं आटोपल्यावर सुमीतने असेच आडून आडून विचारले की आत्या तू इथेच राहतेस का गं? वाड्यात जात नाहीस?" आत्या म्हणाली"काही काम असेल तर तिथे जाऊन येते.पण रहाते इथेच". "का गं? तो एव्हढा मोठा वडीलोपार्जित वाडा आहे ना रिकामा?" सुमीत चाचपणी करीत होता. "हम्म, नाही रहावंसं वाटत तिथे" आत्याने उदास स्वरात उत्तर दिलं. "आणि तुझ्या वाड्यात? गावाबाहेरच्या?" हे आत्याने ऐकलं मात्र तिची चर्याच बदलली. डोळे पाण्याने डबडबले. सुमीतला कसनुसं झालं. उगाच आत्याला दुखावलं असं वाटू लागलं. त्याने झटकन विषय बदलला आणि वातावरण हलकं केलं. एकुणात आत्याने बरंच काही मनात दडवून ठेवलं होतं तर,ज्यावरची खपली सुमीतच्या बोलण्याने निघाली होती.

आत्याच्या घरात झोपण्याच्या आग्रहाला न जुमानता सुमीत रात्री मंदीराच्या अंगणात पथारी टाकून झोपला. प्रवासामुळे थकला असल्यामुळे पडताक्षणीच त्याला गाढ झोप लागली. सकाळी जाग आली ती एका सुगंधाने, मंदीरात लावलेल्या उदबत्तीचा मंद सुवास होता तो. आत्याची पुजा सुरु होती तर. सुमीत उठला. पटापट स्वतःचे आवरुन आला. आत्याने त्याची फर्माईश म्हणून तांदळाच्या पीठाचे घावणे आणि ओल्या नारळाची चटणी बनवली होती. पोटभर नाश्ता करुन आणि तॄप्तीचे ढेकर देत सुमीत म्हणाला, "आत्या, काल मुकुंदा भेटला होता गावात पाटील काकांचा. त्याने घरी बोलावलेय. त्याच्याकडे जाऊन येतो हं". आत्या "बरं" म्हणाली.

मुकुंदाच्या घरी जाताच पाटील काका आणि काकींनी त्याची अगत्याने विचारपूस केली. इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्या. जरा वेळाने मुकुंदाला बाहेर जाऊन येऊ म्हणत सुमीतने त्यांच्या घरातून कल्टी घेतली. दोघे फिरत फिरत लहानपणीच्या आठवणी काढत समुद्रकिनारी पोचले. या निवांत ठिकाणी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून सुमीतने त्याला इथे येण्याचे त्याचे प्रयोजन सांगितले. मुकुंदाचे याबद्द्लचे मत अजमावून पाहिले. मुकुंदाने गावातल्या लोकांचे मन वळवणे शक्य नाही हे ठामपणे सांगितले. हा असा सुरुवातीलाच मुकुंदाने नन्नाचा पाढा वाचल्यावर सुमीत उखडलाच. "अरे पण प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? आपण जाऊ की घराघरात आणि लोकांना आपली भुमिका समजावून सांगू". मुकुंद मात्र स्वतःच्या मतावर ठाम होता. आपल्या वयाच्या मुलाने अशी सपशेल हार मानलेली पाहून सुमीतच्या अंगाचा तिळपापड होत होता. "मग बसा असेच वर्षानुवर्ष भुताखेतांच्या सावटाखाली. लोक चंद्रावर, मंगळावर पाऊल ठेवतायत आणि इथे आपण देसाई वाड्याला निष्कारण गेली दहा-बारा वर्ष टाळं ठोकून आपला पराक्रम मिरवतोय. तिथे घरात ती आत्या वाड्याचं नाव घेताच मुळूमुळू रडत इमोशनल ड्रामा करतेय आणि इथे तू सेफ गेम खेळू पाहतोस. चल यार सोड, मी जातो परत उद्याच्या एस टीने घरी. या गावचं काही होणार नाही च्यामारी."

सुमीत तिरीमिरीत ऊठून जाऊ लागला. मुकुंदाने त्याला बळेच थांबवले. “अरे ऐक मित्रा. हे असं काही व्हावं असं मलाही वाटतं रे. बाबा तर बोलायचे इतकी मोक्याच्या जागी प्रॉपर्टी आहे , तिथे हॉटेल टाकलं तर काय झ्याक चालेल. कोकण टूरिझम डेव्हलप करायला सरकार कर्ज पण देतंय हल्ली कमी व्याजानं”. मुकुंदा नकळत बोलून गेला आणि सुमीत चपापलाच. "काय? काय बोललास तू वाड्याला हॉटेलमध्ये कन्व्हर्ट करायचं असं पाटील काका म्हणत होते?" मुकुंदाने जीभच चावली पटकन., "न..न.. नाही म्हणजे तुझ्या आत्याकडून, थोरल्या मालकांकडून रीतसर विकत घेऊन, कागद्पत्र बनवूनच रे, असाच थोडंच?" मुकुंदा कसंनुसं हसत म्हणाला. "पण ते तसं होईलंसं वाटत नाही. मी एक काम करतो. रात्री बाबांशी बोलून त्यांना तुझा मनसुबा सांगतो. काये ना? आपल्याला कोणा मोठ्या जाणत्या माणसाचा पाठिंबा असंलेला चांगला नाही का?" "हम्म" सुमीत म्हणाला. उद्या वडीलांशी या विषयावर सविस्तर बोलून काय ते सांगतो असं मुकुंदाने सांगितलं आणि दोघं घरी परतले.

सुमीतच्या डोक्यातून मात्र मुकुंदाच्या तोंडून सुटून गेलेलं वाड्याचं हॉटेल बनवणं हे काही केल्या जात नव्हतं. गेली कित्येक वर्षं मुकुंदाचे वडीलच गावचे पाटील होते. थोरले जमीनदार गाव सोडून गेल्यावर त्यांचाच एकछत्री अंमल होता गावावर. आजही आहेच.चांगलेच होते तसे ते. आत्याशीही फार आदराने वागत दोघं पती-पत्नी. पण हे असं हॉटेल चालू करण्याचं काय त्यांच्या मनात असावं? हाच हेतू आणि कारस्थान नाहीये ना या सगळ्यामागे? आधी धाकट्या जमीनदाराचा काटा काढला, थोरले मालक आपोआप मार्गातून दूर झाले. राहता राहिली आत्या. तिला घाबरवून इथून घालवून दिले की.......

सर्रकन काटा आला सुमीतच्या अंगावर. आपण इथे येण्यामागचं कारण मुकुंदाला सांगून चूक तर नाही ना केली? आपला बालमित्र आहे तो हे मान्य पण मध्ये काही वर्षांची गॅप पडलीये, या कालावधीत काय काय घडून गेलंय कोणास ठाऊक. पाटील काकाही बोलायला बरे आहेत, पण कुणाच्या मनाचा थांग लागतो का कधी? आपल्याला पाटीलकाकांच्या प्लॅनची टीप मिळालीये हे कळलं तर हे प्रकरण आपल्या अंगाशीही येऊ शकतं. काय करावं? सोडून द्यावा का हा नाद? उद्या मुकुंदाला न भेटताच तडक गोवा गाठावा झालं. आपण बरं नि आपलं घर बरं. गेला खड्ड्यात साला देसाई वाडा.उलटसुलट विचारांनी सुमीत भंजाळला.

घरी पोचला तो तर अस्वस्थच होता. आत्या आईचा फोन येऊन गेल्याबद्दल काही बाही बोलत होती, त्याचे लक्षच नव्हते. आत्याने निरखून पाहिलं एकदा त्याला आणि विचारलं "काय झालं रे सुम्या? कुठे होतास? गावाबाहेर वाड्यापाशी नव्हता ना रे गेलास? " “नाही गं आत्या, तिथे नव्हतो गेलो मी, विश्वास ठेव जरा", सुमीत खेकसला.

तो दिवस असा बेचैनीतच गेला. रात्री सुमीतला धड झोपही लागली नाही.आत्याच्या खोलीतून उदबत्तीचा सुगंध येत होता, आत्या ही जागीच आहे तर. जप करत असतांना ती ही अदबत्ती लावत असे. सुमीतने शांतपणे विचार केला की उद्या मुकुंद काय म्हणतोय हे तरी पाहू. जर काकांच्या मनात काही वेडंवाकडं असेल तर ते आपल्याला या बाबतीत काही करु देणारच नाहीत. पण जर त्यांनी मदत करायची तयारी दाखवली तर बघुयात की पुढे जाऊन. जरा सावध रहावं लागेल एव्हढंच. वाटल्यास गोव्याहून आपल्या एका मित्राला मदतीसाठी बोलावून घ्यावं. रिस्क तर होतीच. पण
सुमीतला असं अॅडव्हेंचर करायला लहानपणापासून भारी आवडायचं. रहस्य कथांतल्या हिरोसारखं आणि बॉलीवूडमधल्या अक्षय कुमारसारखं, स्वतःचे स्टंटस स्वतःच करायला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच मुकुंदा थडकला. त्याला आलेला पाहतांच सुमीत त्याला घेऊन घराबाहेर आला. आत्याला या सार्‍या प्रकाराची ताकासतूर खबर लागू द्यायची नाही हे आधी मुकुंदाला निक्षून सांगितलं त्याने." हं बोल आता, का आला होतास?" सुमीतने विचारणा केली. "बाबांशी बोललो रात्री, त्यांनी तुला भेटायला बोलावलंय आमच्या वाड्यावर". मुकुंद म्हणाला. "तू हो पुढे मी आलोच" म्हणत सुमीत घरात गेला. आत्याला फक्त चक्कर मारुन येतो सांगून निघाला.

पाटील काका सुमीतची वाटच बघत होते. तो आल्यावर लगेच त्याला घेऊन ते आणि मुकुंदा आतल्या खोलीत आले. दार लावून घेतलं. "इथे कसं निवांत बोलता येईल आपल्याला" म्हणत काकांनी थेट विषयालाच हात घातला. "तुम्ही लोक कसे वहिनीसाहेबांच्या भावकीतले. तूच असं ठरवतोयस हे ब्येसच की.आम्ही काय हो उपरे, आम्ही काही करायला जावं तर आमचाच संशय यायचा म्हणून आम्ही आपलं गप होतो इतकी वर्षं. आता काय करायचंय बोल तू."

"काका", सुमीत बोलू लागला. त्या वाड्यात जायचे, सगळं काही आलबेल आहे हे पहायचे आणि गावकर्‍यांना तशी हमी द्यायची की आम्ही वाड्यात जाऊन आलो. तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. लगेच नाही पणा थोड्या दिवसांनी लोकांचा विश्वास बसू लागेल आणि मग हे वाड्याबद्दल जे नाही नाही ते बोललं जातं ते सारं आपोआप थांबेल. मग बघू पुढे आत्या काय म्हणतेय ते".

"ह्म्म" पाटील काका विचाराधीन झाले. मी तुम्हा दोघांबरोबर आहे. पण जे कराल ते सावधपणे आणि या कानाचं त्या कानाला कळणार नाही असं. आधीच जर ही बातमी फुटली तर लोक विरोध करतील. मी सांगतो ऐका. संध्याकाळी साधारण साडेसातला शेवटची एस टी येते. त्यावेळी थोडी वर्दळ असते त्या बाजूला. ती वेळ एकदा गेली की कोणी फिरकत नाही तिथे. त्यानंतर तुम्ही जा बघा.” अगदीच कुणी पाहिलं तर मी आहेच सावरुन घ्यायला. मात्र पहिल्याच वेळेला जास्त वेळ नको. लवकर परत या.

सुमीतला पटलं त्यांचं बोलणं. वाड्याची चावी थोरल्या मालकांकडेच असते. त्यामुळे आत शिरायचं तर नवी चावी बनवून घेणं हे पहिलं काम होतं. आता चावीवाल्याला इथे आणायचं तर तो तयार व्हायला हवा आणि त्याचं तोंड बंद ठेवायला हवं. आता काय करावं? मुकुंदा म्हणाला, "आधी आपण दोघं बाहेरुन अंदाज तर घेऊ मग बघू." ठरलं तर आज संध्याकाळीच शेवटची एस टी निघून गेली की वाड्याकडे कूच करायचं.

क्रमशः

भाग ४

Keywords: 

लेख: 

वाडा (कथा): भाग ४

सुमीतला पटलं त्यांचं बोलणं. वाड्याची चावी थोरल्या मालकांकडेच असते. त्यामुळे आत शिरायचं तर नवी चावी बनवून घेणं हे पहिलं काम होतं. आता चावीवाल्याला इथे आणायचं तर तो तयार व्हायला हवा आणि त्याचं तोंड बंद ठेवायला हवं. आता काय करावं? मुकुंदा म्हणाला, "आधी आपण दोघं बाहेरुन अंदाज तर घेऊ मग बघू." ठरलं तर आज संध्याकाळीच शेवटची एस टी निघून गेली की वाड्याकडे कूच करायचं.

सुमीत दिवसभर अस्वस्थ होता. त्याची कैक दिवसांची इच्छा खरंतर आज पुरी होणार होती. पण घरच्यांना असं अंधारात ठेवून हे असं मोठं धाडस करणं, समजा काही बिनसलं तर आपण आत्याला, आई-बाबांना कसे काय मॅनेज करणार याचा विचार तो करीत होता. शिवाय मुकुंदा आणि त्याच्या वडीलांबद्द्ल त्याला शंभर टक्के खात्री वाटत नव्हती. त्या दोघांबद्द्ल अतिशय सावधगिरी बाळगायची हे त्याने ठरवलं. सुमीत स्वतः कराटे ब्लॅक बेल्ट होता. त्याच्यासमोर पाप्याचं पितर असलेल्या मुकुंदाचा टिकाव लागणंच शक्य नव्हतं. पण न जाणो पाटील काकांनी कुणाला सुपारी दिली असेल तर...? सावधगिरी बाळगणे आवश्यकच होते. आत्याला मी आज मुकुंदाबरोबर गावाबाहेर जातोय, उद्या येईन असे सांगून तो संध्याकाळी लवकरच घराबाहेर पडला. रात्री उशीर झाला तर तिच्या जीवाला घोर नको उगाच.

ठरल्याप्रमाणे दोघे निघाले. मुकुंदाने टूल बॉक्स बरोबर घेतला होता. एस टी येऊन गेली. काही दोन - चार मंडळी उतरुन गावाकडे निघून गेली. पाच - दहा मिनिटांत सारी सामसूम झाली रस्त्यावर तसे निघाले दोघे वाड्याकडे. सुमीतने पाटील काकांना एस एम एस करुन आत जात असल्याविषयी कळवले. काकांनी अर्धा तास दिला होता. त्या अर्ध्या तासात जर त्यांचा पुन्हा मेसेज नाही आला तर पाटील काका स्वतः येणार होते त्यांना बघायला, असा प्लॅन ठरला होता. आजूबाजुला खूप गवत, झुडपे वाढली होती. त्यातून वाट काढत, दबकत, पावलांचा आवाज न होऊ देता दोघे जात होते. दोन-तीन मिनिटांत ते वाड्यापाशी पोचले. एकदा बाहेरुन वाड्याभोवती एक चक्कर मारुयात असे ठरवून दोघे जाऊ लागले. आतला, आजुबाजुचा कानोसा घेत.... थबकत.... दबकत. भोवताली सावध कटाक्ष टाकत दोघे मागच्या दारी आले. गडग्यावरुन विहीरीपाशी पोहोचले. अंधार पडू लागला होता. अंदाज घेत दोघे मागील दारी आले. पहातात तर.... त्या दाराला कुलुप नव्हतेच. इतकी वर्षं हे मागचं दार असंच कुलुपाशिवाय ठेवलंय की आत्ताच कुलुप उघडून आतमध्ये कोणीतरी....... सुमीतने शक्यता वर्तवली.

आत जाणं जोखमीचं होतं खरंतर. पण आता रिस्क घेतली तर कदाचित 'ते' जे कोण आहे त्याला रेड हँडेड पकडता येईल असा विचार करुन अत्यंत सावधपणे दोघं पुढे झाले.एकमेकांना सूचक खूण करत त्यांनी सावधपणे ते दार ढकलले, अनेक वर्षे न वापरल्यामुळे दरवाजा गच्च बसला होता. दोघेही आवाज न होऊ देता पण दमदार धक्के दाराला देत राहिले. बर्‍याच प्रयत्नांनंतर त्यांना यश मिळाले. दरवाजा किरकिरत उघडला. मुकुंदाने दबकत आत पाऊल टाकले. सुमीत पाठीमागे, बाहेर सर्वत्र चौफेर नजर फिरवत कोणी पहात तर नाहीये ना याचा अंदाज घेत होता. मुकुंदाने सुमीतला आत येण्याची खूण केली. आता सुमीत आत गेला. हळूहळू पुढे चालत असतांना अचानक सुमीतच्या चेहर्‍यावर काहीतरी आपटले. अचानक झालेल्या या विचित्र स्पर्शाने सुमीत गोंधळला. मात्र मुकुंदाने प्रसंगावधान राखून मोबाईलमधली टॉर्च सुरु केली आणि खोलीत सर्वत्र फिरवली. उलटे लटकलेले ते एक वटवाघूळ होते. हुश्श करत दोघे टॉर्चच्या अंधुक उजेडात पुढे जात होते. कित्येक वर्षं वाडा बंद असल्यामुळे सर्वत्र कुबट वास भरुन राहिला होता. धुळीचे साम्राज्य होते. एकेक खोली पहात दोघे पुढे जात होते. सुमीत जमतील तसे भराभर फोटोज काढत होता. दिवाणखान्यात उंची फर्निचर होते पण आता त्याची रया गेली होती. भिंतींना वाळवी लागली होती. रंगांचे पोपडे उडाले होते. एक भकासपणा भरुन राहिला होता सगळीकडे. दोघे अंदाजे वीसेक मिनिटे तिथे असतील. पहिल्याच दिवशी अति स्टंटस नको करायला असा विचार करत दोघांनी आवरते घेतले. आल्या मार्गानेच ते दोघे बाहेर पडले आणि गपचुप साळसुदपणे शेजारच्या गावातून आल्याची बतावणी करत गावात शिरले.

गावात प्रवेश करताच दोघे तडक पाटील काकांना भेटायला गेले. ते वाटच पहात होते. वाड्यातून बाहेर पडतांच मुकुंदाने बाबांना "मिशन फत्ते" असा एसेमेस करुन ठेवला होता. त्या दोघांना आतल्या खोलीत नेऊन पाटील काकांनी सर्व चौकशी केली. पोरं सुखरुप आली याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. नाही म्हटले तरी त्यांना प्रचंड टेंशन आले होते. दोघांकडून सर्व कहाणी ऐकत फोटो बघत त्यांनी विचारले आता पुढची स्टेप काय? सर्व विचाराधीन झाले. खरंतर वीस मिनिटे वाड्यात थांबुनही त्यांना नीट काही बघता आले नव्हते कारण वाड्यात काळोख होता. दिवसाउजेडी वाड्यात जाणे लगेच तरी परवडले नसते त्यांना. सुमीतला एक आयडीया सुचली. मुकुंदा इलेक्ट्रिशियन होता. वाड्यात तात्पुरती इलेक्ट्रिसिटी सुरु करुन सी सी टी व्ही कॅमेरा विथ ऑडीओ रेकॉर्डार बसवायचा. हे एव्हढे जरी केले तरी असे स्टंटस करत लोकांच्या नजरा चुकवत अंधारात तिथे जायची गरज पडणार नाही. सी सी टी व्ही फूटेज लोकांना त्यांची खात्री पटवण्यासाठी दाखवताही आले असते. हा विचार सर्वांना पसंत पडला. दुसर्‍या दिवशीच पाटील काकांच्या ओळखीने रत्नागिरी शहरात जाऊन ही खरेदी करायचे ठरले. पाटील काकांनी सी सी टी व्ही च्या डीलरशी तसे बोलून भेटीची वेळ ही ठरवून ठेवली होती.

दुसर्‍या दिवशी दुपारीच दोघे निघाले रत्नागिरीत जायला मुकुंदाच्या बाईकवरुन. सुमीत नको म्हणत असतांनाही काकांनी पैसे देऊन ठेवले होते. सुमीतच्या मनातला त्या दोघांबद्दलचा संशय मावळत चालला होता. कारण सारे प्लॅनिंग त्याचेच असे आणि हे बाप-लेक ते एक्झिक्युट करायला मदत करत असत.पण तरीही कसलीच रीस्क घ्यायची नाही हे त्यानी पक्के ठरवले होते. एका अज्ञात स्थळी मुकुंदाबरोबर एकटे जाणे ते ही काकांनी सांगून ठेवलेल्या माणसाला भेटायला.... न जाणो काही दगाफटका झाला तर...त्यामुळे बाईक हायवेला लागल्यावर सुमीतने प्लॅन बदलला. मुकुंदाला म्हणाला, की "माझ्या बाबांचा मेसेज आलाय घरी थांबण्यासाठी तर तू जाऊन खरेदी करुन ये मी घरी जातो". मुकुंदाने बरं म्हणत बाईक थांबवली. सुमीतला उतरु दिले अन त्याचा निरोप घेऊन हा पुढे निघून गेलाही. सुमीत यापुढेही असाच सेफ गेम खेळणार होता. मुकुंदाची आणि त्याच्या वडीलांची मदत तर घ्यायची पण स्वतःला सेफ ठेवून. आता त्याला घरी परत जाण्यात काही पॉइंट वाटला नाही. न जाणो मुकुंदाने मी परत येतोय हे कोणाला कळवले असेल तर.... त्यामुळे घरी न जाता तो दबकत, लपत देसाई वाड्यातच शिरला. दिवसा उजेडी कोणालाही कल्पना न देता वाडा पाहण्याची एक आयती संधी त्याला मिळाली होती.

आजही तो त्याच मागच्या दारानेच आत शिरला.आतमध्ये प्रचंड धुळ, ओल, शेवाळ, कुबट वास, कबुतरे, वटवाघळांनी केलेली घाण हेच होतं. एकेक खोली निरखत तो दिवाणखान्यात पोचला. एका ठिकाणी त्याला दिवाणखान्यात एक बंद दार दिसले. कडी लावून ठेवलेले. अरेच्चा. हे नव्हतं दिसलं परवा आपल्याला. त्याने हळूच कडी काढली आणि आत गेला. आत एक प्रशस्त बेडरुम होती. बहुदा हीच आत्याची बेडरुम असावी इथेच ते दोन्ही प्रसंग घडले असावेत. हे जाणवतांच सुमीत जास्तच बारकाईने सगळं निरखू लागला. एका बाजूला मोठा नक्षीदार पलंग. एका कोपर्‍यात दोन कपाटे, इतरही बरेचसे सामान. पलंगाच्या दुसर्‍या बाजूच्या भिंतीवर एक मोठे पेंटींग होते. उत्कॄष्ट रंगसंगती होती. नीट बघताच सुमीतच्या लक्षात आले की ते या वाड्याचेच पेंटींग होते, अगदी हुबेहुब, वाडा नवा कोरा असताना जसा दिसत असेल अगदी तसाच या चित्रात तो दिसत होता. सुमीत गुंग होऊन ते चित्र पाहत राहिला. त्याने त्या खोलीचे, त्या पेंटींगचे बरेच फोटोज काढले. एक गोष्ट सुमीतला जाणवली ती ही की या खोलीत इतर खोल्यांसारखी घाण नाहीये. बर्‍यापैकी साफ आहे ही खोली. पण हे कसे शक्य होते? या खोलीला बाहेर उघडेल असा दरवाजाही नाही आणि ज्या दरवाजातून या खोलीत प्रवेश करता येतो त्या दरवाजाला दिवाणखान्याच्या बाजुने कडी होती आणि दिवाणखान्यात तर धुळीचे साम्राज्य होते. कदाचित बंदीस्त असल्यामुळे या खोलीत धुळ नसेल आली फारशी असं वाटलं त्याला. सुमीतने आता कपाटाकडे मोर्चा वळवला. कपाटात भारी सिल्क साड्या , एक पितळी डबा सापडला. डब्यात बरेचसे दागिने होते. आत्याचे असावेत हे. हे सगळं असं इथे पडून आहे इतकी वर्षं? सुमीत चक्रावला. पण आता शोध मोहीम आवरती घेत तो जसा आला तसाच गुपचुप बाहेर पडला वाड्यातून.

दबकत कानोसा घेत बाहेर पडत असताना त्याला मागे परसदारी विहीरीपाशी कोणीसे बसलेले दिसले. त्याने काही क्षण तिथेच थांबून अंदाज घेतला. एक माणूस होता. शून्यात नजर लावून बसला होता. पण इथे यायला तर सगळे इतके घाबरतात आणि हा कसा काय आला इथे? सुमीत सावधपणे त्याच्याजवळ गेला. सुमीतला पाहताच तो माणूस चपापला आणि पळून जाऊ लागला. सुमीतने चपळाईने त्याला " ए थांब " म्हणत मागून पकडले. तो थरथर कापू लागला. सुमीत त्याची चौकशी करु लागला "कोण आहेस तू? आणि असा इथे बसून काय करतोयस?". त्याने आपले नाव विठू सांगितले. मी तालुक्याला जाता जाता इथे थांबलो होतो असे बोलू लागला. का पण? इथे का थांबलायस असा? इथे कोण भेटणार होतं तुला? बर्‍या बोलानं बोल नाहीतर पोलिसांत देईन. पोलिसांची धमकी देताच तो रडू लागला आणि सांगतो म्हणत बोलू लागला. साहेब माझं लेकरु या हिरीत पडून गेलं, लई वर्स झाली. त्याची आठवण आलती , म्हनून बसलो होतो वाईच." सुमीतला सदाचा विहीरीत पडून झालेला मॄत्यू आठवला. त्याने मुलाचे नाव विचारले, तर सदा हेच सांगितले त्याने. म्हणजे हा वाड्यातला नोकर विठू होता तर. सुमीतने आवाज चढवूनच त्याला इथे कोणी पाठवलंय का याची चौकशी केली. तो नाही नाही म्याच आल्तो म्हणाला. सुमीतने त्याचा पत्ता विचारला. फोटो काढून घेतला आणि इथून निघून जायला सांगितले. परत इथे असा येऊन बसू नकोस हेही सुनावले आणि सोडले त्याला.

घरी आल्यावर त्याने मुकुंदाला फोन करुन चौकशी केली. त्याची खरेदी झाली होती आणि इन्स्टॉलेशनही तोच शिकून परत येत होता. सुमीतने मात्र तो वाड्यात जाऊन आल्याचे मुकुंदला मुळीच सांगितले नाही.संध्याकाळी मुकुंदा परत आला आणि ते तिघे मुकुंदच्या घरात नेहमीच्या खोलीत भेटले. सी सी टी व्ही कॅमेर्‍याचे मॅन्युअल सुमीत चाळत होता. सहज म्हणून त्याने चौकशी केली पाटील काकांकडे की "सदाचे आई-वडील सध्या कुठे असतात?" पाटील काका म्हणाले "ते त्यांच्या गावी निघून गेले पण अधेमधे तालुक्याला जाऊन थोरल्या मालकांना भेटत असतात असं ऐकलंय मी. थोरले मालक त्यांना काही कमी पडू देत नाहीत म्हणे."

अच्छा, म्हणजे विठू खरं बोलत होता तर. सुमीत विचाराधीन झाला. थोरले मालक.... यांना पण एकदा भेटायला हवे खरंतर. तेच कदाचित विठूला हाताशी धरुन..... काहीतरी काळंबेरं आहे इथे. हा विठूच तर नसेल ना आत्याची ती बेडरुम वापरत? पण का करत असेल तो हे? की हे थोरले देसाईच तर नाहीत अमरीश पुरी? आत्याला माहीत असावं का तो विठू इथे येतो ते? की आत्याला अजुनही बरंच काही माहीत आहे? आणि आपल्या ‘खानदान की इज्जत’ वाचवायला ती मूग गिळून आदर्श सूनबाईचा रोल करतेय?.... मुकुंदाने खांद्याला धरुन "सुम्या" अशी हाक मारत गदगदा हलवले तेव्हा सुमीत भानावर आला.

सुमीतने हसत हसत जणू काहीच झाले नाहीसे दाखवले नि बोलू लागला. “चला सामान तर आलं आता महत्वाचा प्रश्न की हे इंस्टॉलेशन कसं आणि कधी करायचं? मुकुंदा तुला जमेल का एकट्याला हे करायला?” मुकुंदा आत्मविश्वासाने “हो” म्हणाला. त्याला आधी वाड्यात इलेक्ट्रिसिटी पुन्हा सुरु करावी लागणार होती.“हे काम शिताफीने झालं पाहिजे मुकुंदा. अंधारात कसं काम करशील तू?” दिवसा उजेडी वाड्यात घुसणे, काम करीत राहणे जोखमीचे होते. गावातल्या कोणी हे बघायला नको होते इतक्यात. शेवटी यावर काहीतरी मार्ग काढू असं पाटील काका म्हणाले आणि सुमीत घरी जाण्यासाठी निघाला.

घरी आल्यावर सुमीतने एक लिस्ट बनवली लॅपटॉपमध्ये. त्याच्या दॄष्टीने या वाड्याशी संबंधित संशयित व्यक्ती:- पाटील काका आणि मुकुंदा हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे थोरले जमीनदार, विठू आणि कदाचित हे कारस्थान अवगत असलेली पण गप्प राहण्यास भाग पाडली गेलेली आत्या? ...

क्रमशः

भाग ५

Keywords: 

लेख: 

वाडा (कथा): भाग ५

घरी आल्यावर सुमीतने एक लिस्ट बनवली लॅपटॉपमध्ये. त्याच्या दॄष्टीने या वाड्याशी संबंधित संशयित व्यक्ती:- पाटील काका आणि मुकुंदा हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे थोरले जमीनदार, विठू आणि कदाचित हे कारस्थान अवगत असलेली पण गप्प राहण्यास भाग पाडली गेलेली आत्या? ...

“हायला सुमीतराव तुम्ही तर एकामागोमाग एक सर्वांवरच संशय घेऊ लागले. अजुन चार-दोन दिवसांत सगळं चाफे गाव संशयितांच्या यादीत सामील नाही झालं म्हणजे मिळवलं.” सुमीत स्वतःशीच हसत बोलला. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला. आता सी सी टी व्ही फूटेज हाच एक मदतीचा मार्ग दिसत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी आत्याने सुमीतच्या हातात एक पत्रक दिलं. ती एक आमंत्रण पत्रिका होती. गावातल्या लहान मुलांसाठी एक उपक्रम आत्या राबवत होती. त्याचा एक भाग म्हणून आज गावात एका आश्रम शाळेतल्या बाई व्याख्यान द्यायला येणार होत्या "सुजाण पालकत्व" या विषयावर. गावात या बाईंचे व्याख्यान व्हावे, ते गावातील लोकांनी ऐकावे यासाठी आत्याने बरेच प्रयत्न केले होते. आत्याचं म्हणणं होतं की सुमीतनेही या कार्यक्रमाला उपस्थित रहावं. सुमीत काय मोकळाच होता बरं म्हणाला तो. संध्याकाळी चारची वेळ होती कार्यक्रमाची.

आत्याला सांगितल्याप्रमाणे सुमीत गावातील शाळेच्या मैदानात पोचला. व्याख्यानासाठी मैदान सजवले होते. स्टेज उभारले होते. समोर खुर्च्या मांडल्या होत्या. आत्या सार्‍या व्यवस्थेवर नजर ठेवून होती. चार वाजायला आले तसे हळूहळू लोक जमू लागले. पाहुण्या आल्या. सारे व्यासपीठावर स्थानापन्न झाले. आत्याही स्टेजवर बसली. सुमीतला एकदम भारी वाटत होतं आत्याला समोर पाहुन. तिने पाहुण्यांची ओळख करुन दिली आणि पाहुण्या बोलण्यास उठल्या. "लहान मुले म्हणजे मातीचा गोळा. आपण जसा आकार देऊ तशी ती घडणार” अशी सुरुवात करुन त्या बोलू लागल्या. “मुलांशी संवाद साधत रहा, लहान वयात जर त्यांच्या मनावर कसला आघात झाला तर त्याचे पडसाद मोठे झाल्यावर उमटतात, डीप्रेशन, स्प्लिट पर्सनॅलिटी अशा गंभीर आजाराच्या स्वरुपात.” सुमीतला बोअर होऊ लागलं. अशी भाषणं ऐकत एका जागी बसायचं म्हणजे... कंटाळवाणं काम. त्याची चुळबुळ सुरु झाली. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला जाणवले की कार्यक्रमाला तुफान गर्दी जमलीये. त्याने मागे वळून पाहिले, सगळ्या खुर्च्या भरल्या होत्या. शिवाय लोक मागे उभे राहून ऐकत होते. त्यांच्या वहिनीसाहेबांनी कार्यक्रमाला यायचे आवाहन केले होते ना... भारी वट आहे आत्याची गावात. अचानक त्याला क्लिक झाले. सगळं गाव इथे आहे तर आपण इथे काय करतोय? विजेचा झटका लागल्यागत तो उठला आणि सरकत गर्दीतून वाट काढू लागला. थोडे दूर जाऊन त्याने मुकुंदाला कॉल केला. तो कुठेतरी काम करत होता. त्याला ताबडतोब देसाई वाड्यावर यायला सांगितले सुमीतने. “आपण आत्ता इंस्टॉलेशन करायचेय”, इतके फोनवर कुजबुजून तो तडक घरी पोचला.

कॅमेरा आणि इतर सामुग्री घेऊन पोचला वाड्यापाशी. काही मिनिटांतच मुकुंदा पोचला. त्याने त्याच्या बाबांना सांगून ठेवले आणि दोघे लागले कामाला. वाड्याबाहेरुन कोणती वायर कशी फिरवायची हे सारे मुकुंदाला माहीत होते. ते तर त्याने चुटकीसरशी केले आणि दोघे आत गेले, सावधगिरी बाळगत. मुकुंदाने विचारले,”कुठल्या खोलीत करायचे फिटींग?” सुमीतने आधीच ठरवले होते बेडरूममध्ये. जे काही आहे ते याच खोलीत याबद्दल त्याची खात्री होती. मुकुंदा चाटच पडला ती खोली पाहून. आधी ही खोली पाहिलीच नव्हती त्याने. सुमीतने त्याला शक्य तितक्या फास्ट काम करायला सांगितले. तोही मग पटापट काम करु लागला तर सुमीत इतरत्र नजर ठेवून होता. तासभर कसा गेला समजलेच नाही. पण मुकुंदाने काम पूर्ण केले.

मुकुंदा घामाघुम झाला होता. सुमीतने तर त्याला मिठीच मारली. अर्धी लढाई जिंकल्याचे समाधान वाटत होते दोघांना. आता लोकांच्या नजरा चुकवत इथे यायला नको. सुमीतने आपल्या लॅपटॉपवरच हे फूटेज पहाता येण्यासाठी आवश्यक ती जोडणी केली. आज रात्री तर दोघांना मोकळे रान मिळणार होते. कारण आत्या त्या व्याख्यात्या बाईंना आश्रमात पोचवण्यासाठी पाटील काकींसह गेली होती. रात्री त्या दोघी तिथेच राहून उद्या गावी परतणार होत्या. रात्री चुकुनही आत्या कधी वाड्यावरुन येणे शक्य नव्हते. त्यामुळे तिनेच हा आश्रमात रहायचा प्लॅन केला होता.

सुमीत आणि मुकुंदाने हा नाईट आउट एंजॉय केला एकदम आत्याच्या घरात. गप्पा, मूव्हीज आणि अधेमधे सी सी टीव्ही फूटेजमध्ये काही संशयास्पद आढळंतय का ? याची चाचपणी. कसलं काय, रात्रभर त्या खोलीत सुमीतच्या अपेक्षेप्रमाणेच संशयास्पद हालचाल, कुणाचे अस्तित्व, काहीच वेगळे जाणवले नाही. सुमीत अगदी आत्मविश्वासाने मुकुंदाला सांगत होता. “माझी पूर्ण खात्री होती की इथे काही प्रॉब्लेम नाहीच आहे. उगाच वाड्याला भुतांच्या तावडीत देऊन ठेवलंय तुम्ही गावकर्‍यांनी.” दोघंही एकमेकांना टाळ्या देत हसले.

सकाळ झाली. सुमीतला आज खूपच मोकळे वाटत होते. एकदम खुशीत होता तो. उराशी बाळगलेले एक स्वप्न पूर्णत्वाला पोहोचू पहात होते. त्याने चहा केला. मुकुंदालाही दिला. नंतर भेटू म्हणत मुकुंदा त्याच्या घरी निघून गेला. सुमीतने आई-बाबांना फोन केला. बराच वेळ मनसोक्त गप्पा मारल्या त्याने दोघांशी. इतके दिवस आई-बाबांपासून सारे लपवून ठेवायचे असल्यामुळे तो त्यांच्याशी अगदी मोजकेच, तुटक बोलत होता फोनवर. पण आता त्याची गरज नव्हती. आता एक - दोन दिवसांत तो हे सगळं उघड करणार होता गावकर्‍यांसमोर. बाबांची तर त्याला चिंताच नव्हती. त्यांना सुमीतने केव्हाच खिशात टाकले होते. इकडच्या बर्‍याचशा घडामोडीही तो आईला सांगत नसला तरी बाबांच्या कानावर अधून मधून घालत असे. बाबा आईसारखे ओव्हर रिअ‍ॅक्ट होत नसत. फक्त काळजी घे स्वतःची, सावध रहा, जपून इतकंच मोघम बोलत असत.पुढील कार्यवाही ठरवण्यासाठी तो मुकुंदाकडे पोचला.

पाटील काकांनी त्याला पहाताच त्याचं स्वागत केलं, "या या सुमीतराव. खूश आहात न्हवं? झालं का तुमच्या मनाजोगं सारं?" सुमीतने आनंदाने मान डोलावली. पाटील काका म्हणाले "मग आता बोलून घ्या तुमच्या वडीलांशी, आत्याशी. आम्हीही गावात एक मिटिंग घेतो नि सांगतो समद्यांस्नी". "नाही, नाही काका, थांबा एव्हढ्यात नको" सुमीतने त्यांना अडवले. "का हो? आता काय बाकी आहे?" "आहे ना अजुन एक काम बाकी आहे. ते आज पूर्ण करुयात आणि उद्या घ्याच तुम्ही मिटींग". पाटील काका प्रश्नार्थक मुद्रेने सुमीतकडे बघत राहिले. "काका", सुमीत म्हणाला, "आजची रात्र मी आणि मुकुंदा वाड्यात झोपणार. आम्ही रात्रभर तिथे राहून, सकाळी सुखरुप वाड्यातून बाहेर आलो हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा तोच एक पुरावा पुरेसा आहे वाड्याच्या भितीतून गावाला बाहेर काढायला. मग आपल्याला कोणाला काही पटवून द्यायची गरजही नाही पडायची." हे ऐकलं मात्र पाटीलकाका हादरलेच एकदम. "छ्या, छ्या, हे करायची काय बी गरज न्हाय. क्यामेरा हाय न्हवं? इतकं बास झालं बघा. तुम्ही दोघी तरनीताठी पोरं असं वंगाळ काय करु नका." पाटील काकांनी आपला नकार स्पष्टपणे दर्शवला. जसं सुमीतने हे सगळं आत्यापासून त्याच्या आई-वडीलांपासून लपवून ठेवलं होतं तसंच मुकुंदाच्या आईलाही याची अजिबातच कल्पना नव्हती. सुमीत मात्र हट्टास पेटला. "तुम्हाला अजून भिती वाटतेय का काका? अहो आम्ही नाही का जाऊन आलो तिथे दोन -तीनदा? काही असतं तर जाणवलं असतंच ना. आपण एक काम करुयात. वाड्याच्या पुढल्या दाराला कुलुप आहे. आपण अजुन एक आपले कुलुपही लावू आणि आम्ही आत गेलो की मागच्या दारालाही लावून घ्या तुम्ही एक कुलुप. म्हणजे कोणी घुसून हल्ला करायचा प्रश्नच येणार नाही. आणि तुम्हाला काळजी नाही." सुमीत तर इरेला पेटला. एव्हाना मुकुंदालाही हे असलं साहस आवडू लागलं होतं. तो ही हट्ट करु लागला. शेवटी पाटील काकांच्या खास विश्वासातले दोन तगडे सशस्त्र नोकर वाड्याच्या पुढल्या आणि मागल्या दारी रात्रभर पहार्‍यावर राहतील या अटीवर त्यांनी नाखुशीनेच हे मान्य केले. आता सुमीतने अजून एका गोष्टीसाठी हट्ट केला. ती म्हणजे काकांनी गावाबाहेर शेतात असलेल्या त्यांच्या वाड्यात रहायचे आजची रात्र. "हे कशाला आता? त्या वाड्यात मोबाईल रेंज पकडत न्हाय. तुम्हास्नी काय लागलं सवरलं म्हंजी?" "काका, याची आवश्यकता आहे. उद्या जर गाववाले भडकले तर तुम्ही गावात नव्हताच आणि पोरापोरांनी मजा-मस्तीत वाड्यात रहायचं ठरवलं. मला हे काहीच माहीत नव्हतं अशी तुम्हाला सारवासारव करता यावी म्हणून. आणि आमची चिंता सोडा. आम्हाला काहीही होणार नाही. तुमचे पहारेकरी असणारच आहेत की हाकेच्या अंतरावर." नव्या पिढीचे, तरुण रक्त आणि त्यांचा आग्रह यापुढे काकांना अनिच्छेने का होईना पण मान तुकवावीच लागली.

आत्याला आणि मुकुंदाच्या आईला, सुमीत आणि मुकुंदा बरोबर पाटील काका त्यांच्या शेतातल्या वाड्यावर रात्री जाणार आहेत अशी बतावणी करण्यात आली. सबंध दिवस सुमीत , मुकुंदा आणि पाटील काका आवश्यक वाटेल अशी प्रत्येक वस्तू विचारपूर्वक बरोबर घेत होते. मोबाईल, लॅपटॉप फुल्ल चार्ज केले गेले. पाणी, सुका खाऊ, इमरजंसी औषधे. काकांनी तर त्यांच्या जवळ असलेला एक खास रामपुरी चाकू मुकुंदाच्या पिशवीत टाकला. जवळ असलेला बरा या उद्देशाने.

दिवस ढळला. संध्याकाळी आपापल्या घरातच राहून लवकर जेवून निघायचे असा प्लॅन होता. सुमीत आत्याशी बरीच चेष्टामस्करी करीत होता. तिला हसवत होता. तिने केलेलं गरम गरम कुळथाचं पिठलं आणि भाकरी त्याने आडवा हात मारुन खाल्ली आणि निघाला सुमीत. "उद्या सकाळी येईन बरं का आत्या" असं म्हणत त्याने आत्याचा निरोप घेत घराबाहेर पाऊल टाकले अन अचानक परत वळला. खाली वाकून तिच्या पायांना स्पर्श केला त्याने. अचानक हे काय असं करतोय सुमीत हे न कळून आत्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला "यशस्वी हो" असं बोलून गेली ती. सुमीत चमकला. हिला कसं सुचलं याच आशिर्वादाची मला गरज आहे ते? किती साधी, भाबडी आहे बिचारी. गेले कित्येक दिवस आपण तिच्या घरात राहून तिला फसवून हे सगळं करतोय. त्याला एकदम अपराधी वाटू लागले. पण सावरले त्याने स्वतःला आणि आत्याचा निरोप घेत घराबाहेर पडला.

मुकुंदा आणि काका गाडीत त्याची वाटच पहात होते. तिघे निघाले तडक. वाटेत काका दोघांवर असंख्य सुचनांचा भडीमार करत होते. काय करा? काय नाही? अगदी गरज लागलीच तर त्यांच्या एका इंस्पेक्टर दोस्ताचा नंबरही त्यांनी देऊन ठेवला होता. दोघेही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. नाही म्हटलं तरी त्यांनी परवानगी दिली म्हणून हे इतकं धाडस तरी करु शकले होते दोघे मिळून.

बोलतच तिघे वाड्यापाशी आले. शेवटची एस टी केव्हाच निघून गेली होती आणि म्हणून रस्त्याला सामसूम झाली होती. काका आज प्रथमच वाड्यात येत होते. ठरल्याप्रमाणे त्यांचे दोन विश्वासू पहारेकरीही हजर झाले.सर्वप्रथम काकांनी स्वहस्ते वाड्याच्या दर्शनी दरवाजावर असलेल्या आधीच्या कुलुपावर स्वतःचे भक्कम कुलुप बसवले. एक चावी स्वतःकडे ठेवून घेतली. तर दुसरी त्या पहारेकर्‍यास दिली. तिघे मागील दाराने आत गेले. काकांनी स्वतः जातीने सगळ्या खोल्यांत फिरुन खात्री करुन घेतली. बेडरुममध्ये, जिथे मुले रहाणार होती तिथे तर विशेष लक्ष देत पहाणी केली. जुजबी सफाई करुन घेतली.खोलीत त्यांनी एक मंद दिवा लावला होता, आतमध्ये तर प्रकाश पडेल पण बाहेरुन विशेष उजेड जाणवणार नाही असा. त्यांच्या माणसांस डोळ्यांत तेल घालून राखण करण्यास सांगितले आणि काही संशयास्पद वाटल्यास मुलांच्या हाकेची वाटही न पाहता वाड्यात घुसण्याच्या सुचना दिल्या. मुकुंदाच्या पिशवीतून आणलेला रामपुरी चाकू त्यांनी तिथेच पलंगाशेजारील साईड टेबलवर ठेवला आणि वेळ पडल्यास स्वसंरक्षणार्थ तो वापरण्यास दोघांना सांगितले. शेवटी मुकुंदा म्हणाला, "बाबा आम्ही कुठे सात समुद्रापल्याड नाही इथे गावातच राहणार आहोत". सगळेच हसले आणि वातावरणातला ताण हलका झाला. दोघांनी काकांना वाकून नमस्कार केला. “काळजी घ्या पोरांनो.” “काका तुम्ही साथ दिलीत म्हणून इथवर पोचलो आपण” सुमीतने कबुल केले. त्या दोघांच्या पाठीवर थोपटत मागील दाराला कुलुप लावून घ्या याची आपल्या माणसांना आठवण करुन देत काका वाड्याबाहेर पडले सावधपणे.

काकांची गाडी दूर निघून गेलेली दिसताच दोघांनी जरा वेळ टी पी केला. मग सुमीतने लॅपटॉप उघडला. सी सी टीव्ही चे रेकॉर्डींग लॅपटॉपवर पहाण्या/ऐकण्यासाठी काय आणि कशी जोडणी करायची? ते कसे पहायचे हे मुकुंदाला शिकवले. स्वतःच्या लॅपटॉपचा पासवर्डही शेअर केला. मुकुंद गोंधळला. "तू हे आत्ताच का मला दाखवत आहेस?" त्याने विचारणा केली. "कारण आज रात्री माझा लॅपटॉप तुझ्याकडे असणार आहे म्हणून." सुमीत उत्तरला. मुकुंदा अजुनच गोंधळला. सुमीत त्याच्या जवळ गेला आणि त्याला सांगितले,"मित्रा आजवर साथ दिलीस . आता यापुढे नाही. आता ही लढाई माझी एकट्याची आहे. तुझा जीव धोक्यात नाही घालणार मी" मुकुंदाचे डोळेच विस्फारले. "काय बोलतोयस तू हे सुम्या; बाबा असतांना काही सांगितले नाहीस?” “हो. कारण त्यांनी मला एकट्याला नसते राहू दिले इथे. पण माझा निर्णय झालाय तू आता गावात परत जाणार आहेस." "अरे पण का? राहुयात की आपण दोघे" मुकुंदा कळवळून त्याला सांगत होता. सुमीत ठामपणे म्हणाला" नाही, उद्या मी इथून सुखरुप बाहेर येणार आहे या बद्दल मला ९९ % खात्री आहे. पण १ % काही बिनसले, तर... तर आपली मेहनत वाया जाऊ नये. इथे जे झालं ते या कॅमेर्‍याच्या मदतीने तू काकांना, गावकर्‍यांना आणि वेळ पडल्यास पोलिसांना दाखव. त्यासाठी तुला सेफ रहावेच लागेल आणि तसंही ही माझी इच्छा होती. माझ्या हट्टापायी मी कुणाचा जीव धोक्यात कधीच घालणार नाही." "अरे पण सुम्या ऐक माझं जरा" मुकुंद समजावणीच्या सुरात बोलू लागला. "बास्स, चल निघायचं आता इथून", त्याने दरडावत निक्षून सांगितले मुकुंदाला. मुकुंदाचे काही चालले नाही. सपशेल हार पत्करत तो निघाला स्वतःचे सामान घेऊन. त्याने एकदा सुमीतला घट्ट मिठी मारली,दोघंही इमोशनल झाले , सुमीत म्हणाला," तुला थँक्यु म्हणून तुझा अपमान नाही करणार पण तू मैत्री निभावलीस मित्रा". “जप स्वतःला” म्हणत मुकुंदा घराबाहेर पडला.

मुकुंदाला वाड्याबाहेर पडून गावाच्या दिशेने जाताना सुमीतने खिडकीतून पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला. हे एक अत्यंत जोखमीचं काम आपण कसं काय पार पाडू शकू याबद्दल त्याला साशंकता होती. पण साधलं ते आणि एका दगडात दोन पक्षी मारले गेले. काकांना गावापासून दूर, मोबाईल रेंज नसलेल्या ठिकाणी पाठवणे आणि मुकुंदाला घरी. मात्र काकांच्या लेखी दोघं एकत्र वाड्यात आहेत, एकाला दुसर्‍याची सोबत आहे. शिवाय वाड्याबाहेर आपल्या विश्वासू माणसांचा पहारा. सुमीतसह आपला लेकसुद्धा वाड्यात असल्यामुळे काकांच्या मनात यदाकदाचित काळंबेरं असेल तरी आज रात्री त्यांना काही करता येणार नव्हतं. मुकुंदाबरोबर वाड्यात रहाण्याची बतावणी याचसाठी सुमीतने केली होती. त्यामुळे आज रात्री सुमीत काकांच्या विश्वासू नोकरांच्या पहार्‍यात सुरक्षितच रहाणार होता. काकांच्या डोळ्यांत सुमीतने लेकाविषयीची काळजी नीटच पाहिली होती, त्यामुळे तो मुकुंदाला सोबत राहू देणारच नव्हता. कोणालाही न दुखावता त्याने सारे काही आपल्या प्लॅननुसार मनाजोगे करुन घेतले, शिताफीने, इतक्या शिताफीने की मघाशी मुकुंदाने जेव्हा सुमीतला मिठी मारली तेव्हा त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल सुमीतने काढून घेतल्याचेही मुकुंदाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे मुकुंदा आता बाबांना किंवा इतर कोणालाही फोन करुन सुमीत एकटा आहे हे कळवू शकत नव्हता. आज त्याची बाईकही सर्व्हिसिंगला दिली होती. शेतापर्यंतचे अंतर काळोखात पायी जाण्यासारखेही नव्हते. त्यामुळे बाप-लेक रात्री एकत्र येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मुकुंदा बिच्चारा, “उद्या जर काही बिनसले तर माझा लॅपटॉप वापरुन तू सगळं रेकॉर्डींग पोलिसांना दाखव त्यासाठी तुला सेफ रहायलाच पाहिजे" या इमोशनल डायलॉगला बळी पडला होता.” सुमीत खदखदून हसला. अरे मुकुंदा,वेड्या ९९ % काय मला आता तर १०८% खात्री आहे की मी उद्या इथून सुखरुप बाहेर पडेनच.

सुमीतने मुकुंदाचा फोन बंद करुन ठेवला आणि स्वतःचा फोन हातत घेतला. काही मेसेज आहे का पाहिलं. अचानक त्याला आईची प्रकर्षानं आठवण आली. आई, गेले काही दिवस तुला न सांगता बरंच काही करतोय गं. मला माहितीये तुला मुळ्ळीच पसंद पडलं नसतं हे. पण आई हे आजचं शेवटचं. खरंच शेवटचं आणि आई माझी खात्री आहे की तुला उद्या जेव्हा हे सारं कळेल ना तेव्हा वरकरणी तू रागावशीलही माझ्यावर की कशाला सुम्या इतकी जोखीम पत्करलीस? पण आयॅम शुअर मनातुन तुला आणि बाबांना माझा अभिमानच वाटेल. निस्वार्थीपणे गावाच्या, आत्याच्या भल्यासाठी काहीतरी करुन दाखवलं माझ्या बाळाने असं अभिमानाने सांगशील तू सर्वांना. आईचा डीपी निरखत त्याने "लव्ह यू मम्मा" म्हणत आईला गुडनाईट किस केले आणि फोन बाजूला ठेवला.

रात्री शक्यतो झोपायचे नाही असे ठरवले होते सुमीतने. पण मोबाईल डिस्चार्ज होईल म्हणून त्याने नेट बंद ठेवले होते आणि लॅपटॉप तर मुकुंदाबरोबर पाठवून दिला होता. त्यामुळे आता कंटाळला तो. मध्यरात्र उलटून गेली. डोळ्यांवर झापड येऊ लागली सुमीतच्या आणि पलंगाच्या बैठकीला पाठ टेकून नि पाय पसरुन बसलेला सुमीत नकळत निद्राधीन झाला.

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

क्रमश:

भाग ६

किंवा

भाग ६-अ

Keywords: 

लेख: 

वाडा (कथा): भाग ६-अंतिम

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

दिवस उजाडला. सूर्याची कोवळी, उबदार किरणे चाफे गावावर सोनेरी पखरण करु लागली. शहरासारखं आखीव रेखीव घड्याळाच्या काट्यावर फिरणारं जीवन इथे नजरेस पडत नसलं,तरी संथ गतीतलं साचेबद्ध जीवन जगायची ही लोकं. आज मात्र गावकर्‍यांनी तो साचा जणू झुगारुन दिला होता. एरव्ही कधी देसाई वाड्याच्या वार्‍यालाही न थांबणारी गावातली माणसं आज मात्र घोळक्या-घोळक्याने देसाई वाड्याभोवतीच जमलेली दिसत होती. गाव जणू ओस पडलं होतं आणि देसाई वाड्याभोवती सकाळी सकाळी जत्रा फुलली होती. सर्वतोमुखी 'सुमीत' हे फक्त एकच नाव ऐकू येत होते. विशीच्या कोवळ्या वयात त्याने दाखवलेले धाडस, जिद्द,आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सारं केवळ कौतुकास्पद होतं. सर्वांत वाखाणण्यासारखा गुण म्हणजे रुढी परंपरांचं जोखड उखडून फेकून देऊन जे सत्य आहे ते शोधण्याचा त्याने केलेला प्रामाणिक प्रयत्न. सत्य गावासमोर यावं हा त्याचा ध्यास भल्याभल्यांना लाजवेल असा होता. त्यामुळे आज तो चर्चेचा विषय बनला तर नवल नव्हते.

पाटील काकाही शेतातल्या वाड्यावरुन भल्या पहाटेच गावात पोहोचले होते. आज त्यांची लगबग तर विचारायलाच नको अशी होती. सतत कोणाला तरी फोन करत होते, आलेल्या फोनना उत्तरं देत होते. गावातल्या तरण्याताठ्या मुलांना हाताशी घेऊन वेगवेगळे हुकुम सोडत होते.सगळं गाव त्यांच्या इशार्‍यावर नाचत होतं. थोडीफार तशीच अवस्था मुकुंदाचीही. तो ही बाबांच्या मागे-पुढे करत होता आणि एका रात्रीत ‘स्टारडम’ प्राप्त झालेला आपला 'सुपरस्टार' सुमीत.... तो कुठे होता या सगळ्या गदारोळात? आज आणि पुढचे काही दिवस 'लाईमलाइइटमध्ये' तो असणार होता त्याची सवय तर लावून घेत नव्हता? की यापासून दूर राहू पहात होता?
सुमीत या कशातच नव्हता.
कारण
.
.
.
.
.
वाड्याभोवतीच्या गूढतेच्या वलयाचा पर्दाफाश करत असताना, देसाई वाड्याने तिसरा बळी घेतला होता.... सुमीतचा!
-------------------------------------------------------------------------------------------------
सायरन वाजवत पोलिसांची व्हॅन वाड्यासमोर येऊन थडकली. पाटील काका लगबगीने सामोरे गेले. सर्वप्रथम खून पाहणारे आणि पोलिसांना बोलावणारे असे पाटील काका, मुकुंदा आणि वाड्याबाहेर पाटील काकांनी ठेवलेले पहारेकरी अशा चौघांना फक्त वाड्यात येण्यास सांगून बाकीची गर्दी पोलिसांनी पांगवली.

या चौघांची प्राथमिक चौकशी, काय आणि कसकसे घडले हे इंस्पेक्टर जाणून घेत होते. तर इतर अधिकारी बॉडीची पाहणी करत रिपोर्ट बनवत होते. प्रत्येकाकडे भेदक दॄष्टीक्षेप टाकत, इंस्पेक्टर साहेब उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती करत होते.

चौकशीला सामोरे जात असतांना मुकुंदाला रात्रीचा त्याचा आणि सुमीतचा शेवटचा संवाद आठवला...”उद्या मी इथून सुखरुप बाहेर येणार आहे या बद्दल मला ९९ % खात्री आहे. पण १ % काही बिनसले, तर... तर आपली मेहनत वाया जाऊ नये. इथे जे झालं ते या कॅमेर्‍याच्या मदतीने तू काकांना, गावकर्‍यांना आणि वेळ पडल्यास पोलिसांना दाखव" किती हे प्रसंगावधान सुमीतचे. मुकुंदाच्या डोळ्यांत टचकन पाणी आले आणि त्याने इंस्पेक्टर साहेबांना सी सी टी व्ही फूटेज बघायची विनंती केली.

तिकडे घरात आत्यालासुद्धा बातमी समजली होती. तिच्या अवस्थेचं तर वर्णन करणं कठीण होतं. सदाच्या मॄत्यूच्या वेळी झाली होती तशीच काहीशी अवस्था. पण सुमीतचे पालक म्हणून इथे तर तिचा भाऊ आणि वहिनी होते. काय उत्तर देणार होती ती त्यांच्या प्रश्नांना? परीक्षेनंतर श्रमपरिहारासाठी बोलावून घेतलेल्या आपल्या भाच्याचा असा आपल्या वाड्यात दुर्दैवी आणि खुनी हल्ल्यात मॄत्यू व्हावा? इतके दिवस तो आपल्या घरात रहात असतांना त्याचे वाड्यासंबंधित जे काही उद्योग सुरु होते ते आपल्याला कळूही नयेत? पण कोणाला काय आणि कसे उत्तर द्यायचे यापेक्षाही आत्याचं हॄदय विदीर्ण होत होतं ते या एकाच भावनेने....की सुमीत हा तिचा एकुलता एक आणि त्यामुळे अत्यंत लाडका भाचा होता. त्याच्यावर तिनं जितकं प्रेम, माया केली तितकी आजवरच्या आयुष्यात कुणावरही केली नव्हती. म्हणूनच दु:खातिशयाने तिच्या डोळ्यांतले अश्रुही गोठून गेले होते. कोरड्या ठाक डोळ्यांनी ती गाभार्‍यातल्या मूर्तीकडे बघत बसली होती...एकटक निश्चल....जणू या सर्वांचा जाब देवीकडे मागत असल्यागत.

इकडे वाड्यात मुकुंदाने इंस्पेक्टर साहेबांची परवानगी घेऊन सुमीतचा लॅपटॉप ऑन केला. रात्री जे काही रेकॉर्ड झालं होतं ते तो दाखवू लागला. जे काही दिसलं, ऐकू आलं ते पाहून, ऐकून सगळे अंतर्बाह्य हादरले.

सुमीत झोपून गेल्यावर बर्‍याच वेळानंतर खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. नीट बघताच एक व्यक्ती खोलीत आल्याचे दिसले. अंधुक प्रकाशात चेहरा, कपडे नीट दिसत नव्हते. पण ती व्यक्ती सराईताप्रमाणे वावरत होती. अचानक त्या व्यक्तीचे लक्ष पलंगावर गाढ झोपलेल्या सुमीतकडे गेले आणि.... आणि काय झाले ते कळलेच नाही ती व्यक्ती हिंसक झाल्यागत स्वतःच्या डोक्यावर दोन्ही हात मारुन घेत इथे तिथे पाहू लागली...कसला तरी शोध घेत असल्यासारखी. कॅमेर्‍यात काहीतरी चमकल्याचे जाणवले. ती व्यक्ती त्या दिशेने जाऊ लागली. पलंगाशेजारी साईड टेबलवर पाटील काकांनी ठेवलेला चाकू होता तो. दुसर्‍या क्षणी त्या व्यक्तीने तो चाकू उचलून सुमीतवर हल्ला केला.....घाव एकदम वर्मी लागला होता..........इतकी निर्घॄण हत्या समोर बघताच नकळत सर्वांनी डोळे झाकून घेतले.

इंस्पेक्टर साहेबांनी आपला मोर्चा आता पहारेकर्‍यांकडे वळवला. कुलपाच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. कोण आलं होतं ? आणि त्या व्यक्तीला आत का जाऊ दिलं? हा ओघानेच आलेला प्रश्न. पहारेकरी काहीच सांगू शकले नाहीत. त्यांच्या मते रात्रभर दोन्ही दारांपाशी कोणीही आलं वा गेलं नव्हतं.सुमीत ज्या खोलीत झोपला होता, त्या खोलीपासून पुढले व मागले दार दूर असल्यामुळे की काय नकळे पण त्यांना त्या खोलीतूनही कसलाच आवाज आला नव्हता. तितक्यात मुकुंदाला काहीतरी जाणवले त्याने रिवाईंड करत ती व्यक्ती आत येत होती तो भाग पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली.

बेडरुममध्ये आत येण्याचे दार दिवाणखान्यातून होते, जे बंद करुन सुमीत झोपला होता आणि ती व्यक्ती त्या दारातून आत आलीच नव्हती. तर दुसर्‍या भिंतीवर जे वाड्याचं पेंटींग होतं ते हलताना दिसत होतं आणि त्यामागूनच ती व्यक्ती आत आली. ताबडतोब इंस्पेक्टर साहेब त्या खोलीत पोचले आणि ते पेंटींग बाजूला करण्यास लावले. त्या भिंतीवर ठोकून पाहिले असता सिमेंटच्या भरीव भिंतीवर ठोकल्यावर होतो तसा आवाज आला नाही. काहीतरी पोकळ असल्याचे जाणवले. हवालदारांना कामाला लावून त्या भागावर दमदार आघात केले असता दरवाजा उघडला. काही पायर्‍या खाली जात होत्या आणि आतमध्ये अंधार.

सावधगिरी बाळगत पोलिसांचे पथक आत गेले. बॅटरीच्या उजेडात पायर्‍या उतरताच ते एक भुयार असल्याचे लक्षात आले. आतमध्ये काही अंतर चालून गेल्यावर परत तशाच वर जाणार्‍या पायर्‍या होत्या. त्या जिथे उघडत होत्या ते दारही फोडून उघडण्यात आले. दार एका स्वयंपाकघरात उघडत होते. बंद, न वापरते स्वयंपाकघर. मोठा वाडाच होता तो.पोलिस पथक सार्‍या रिकाम्या खोल्यांतून फिरत वाड्याच्या दर्शनी भागात पोचले. तो देसायांचा गावातला वडीलोपार्जित वाडा होता, जिथे देसाई पती- पत्नी पूर्वी रहात असत. याचाच अर्थ दोन्ही देसाई वाडे जमिनीखालून जोडले गेले होते तर... आणि ही गोष्ट कोणाकोणाला अवगत होती? इंस्पेक्टर साहेबांनी पाटलांना विचारले. त्यांनी नकारार्थी मान हलवली. म्हणजे ही गोष्ट माहीत असण्याची शक्यता होती- वाडा बांधून घेणार्‍या देसायांना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि कदाचित वाड्यात कामाला असणार्‍या नोकरांना. यांपैकी नेमके कोण 'ती रात्री भुयारातून आलेली व्यक्ती’ होती जिने सुमीतला मारलं??

मात्र इंस्पेक्टर साहेबांना यावर जास्त काम करावे लागले नाही. सुमीतने विचारपूर्वक कॅमेरा विथ ऑडीओ रेकॉर्डर बसवून घेतला होता वाड्यात. या शुटींगमध्ये 'त्या खुनी व्यक्तीचा' आवाजही रेकॉर्ड झाला होता आणि सारी संदिग्धता त्यामुळेच दूर झाली होती.

सुमीतवर हल्ला केल्यावर ती व्यक्ती चक्क बोलू लागली. कोणाशी पण? सुमीतशी? पण सुमीतचा तर प्राण केव्हाच निघून गेला होता. मग कोणाशी? स्वतःशीच? पण स्वतःशी का असं कोणी उघडपणे मोठमोठ्याने बोलतं? की मग अजून कोणी त्या वेळी त्या खोलीत होतं ज्याचं अस्तित्व त्या खुनी व्यक्तीलाच फक्त माहीत होतं आणि त्या तिसर्‍या कोणाशी तरी ही खुनी व्यक्ती बोलत होती?..... देसाई वाड्यातील पिशाच्च त नव्हे?......

वाड्याचे गूढ उलगडले गेले होते ते याच बोलण्यामुळे. पोलिसांना तर आता कसलाच तपास करावा लागणार नव्हता. करायची होती फक्त कारवाई. त्यासाठीच सारे थांबले होते....वाट बघत.....

वाड्याबाहेर गलका वाढला. एक गाडी येऊन थांबली. आतून थोरले जमिनदार उतरले. जड पावलांनी, खाली मान घालत, म्लान वदनाने वाड्यात आले. इंस्पेक्टर साहेबांनी आणि पाटील काकांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. बसायला जागा दिली. इंस्पेक्टर साहेबांनी इशारा करताच मुकुंदाने पुन्हा एकदा रिवाईंड करुन रेकॉर्डींग सुरु केले.

सगळे बघत होते. थोरले मालकही. खून केल्यावर खुनी व्यक्ती बोलू लागली.भयंकर संतापलेल्या सुरातले ते बोलणे होते.
.
.
.
.
.
.
"अरे चांडाळा? पुन्हा आलास? का ? कशासाठी? माझ्यावर परत अत्याचार करायला? कितीदा सांगितले माझ्या घरात येऊ नकोस. पहिल्या वेळी आलास तेव्हा खरंच अजाण, निरागस वयात होते मी, त्यात एकटी म्हणून डाव साधलास. पण त्यानंतर प्रत्येक रात्र मी जागून काढलेय, सावध रहात. तू पुन्हा आलास माझ्या या घरात, धाकट्या जमिनदाराचं रुप घेऊन? इथे? माझ्या खोलीत? पण मी बेसावध नव्हते बरं. तुला तुझ्याच शस्त्राने मारलं मी. त्यानंतरही हिंमत केलीस? सदा बनून आलास? अरे तेव्हा तर उशीखाली दाबून फेकून दिले तुला विहीरीत. तेव्हा बजावलं होतं चालता हो, कायमचा निघून जा. तरी आज आलास? बघून घेते तुला. नाही सोडणार जिता. कितीही वेळा आलास तरी नाही सोडणार्,पुन्हा कधीच माझ्या घरात माझ्यावर अत्याचार नाही करुन देणार तुला.”

हे सारं पहाताना थोरल्या जमिनदारांचे डोळे पाझरत होते. इंस्पेक्टर साहेबांनी सांत्वनपर त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला. आपल्या वॉलेटमधून एक कार्ड बाहेर काढून ते थोरल्या मालकांच्या हाती सरकवलं.थोरले मालक बघत होते. ते एक विझिटींग कार्ड होतं. रत्नागिरी शहरातील प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञाचं....वहिनीसाहेबांसाठी !!

समाप्त

Keywords: 

लेख: 

वाडा (कथा): भाग ६-अ-अंतिम

(भाग ५ नंतर हे वाचा)

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

दिवस उजाडला. सूर्याची कोवळी, उबदार किरणे चाफे गावावर सोनेरी पखरण करु लागली. शहरासारखं आखीव रेखीव घड्याळाच्या काट्यावर फिरणारं जीवन इथे नजरेस पडत नसलं,तरी संथ गतीतलं साचेबद्ध जीवन जगायची ही लोकं. आज मात्र गावकर्यांनी तो साचा जणू झुगारुन दिला होता. एरव्ही कधी देसाई वाड्याच्या वार्यालाही न थांबणारी गावातली माणसं आज घोळक्या-घोळक्याने देसाई वाड्याभोवतीच जमलेली दिसत होती. गाव जणू ओस पडलं होतं आणि देसाई वाड्याभोवती सकाळी सकाळी जत्रा फुलली होती. सर्वतोमुखी 'सुमीत' हे फक्त एकच नाव ऐकू येत होते. विशीच्या कोवळ्या वयात त्याने दाखवलेले धाडस, जिद्द,आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करुन त्याच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सारं केवळ कौतुकास्पद होतं. सर्वांत वाखाणण्यासारखा गुण म्हणजे रुढी परंपरांचं जोखड उखडून फेकून देऊन जे सत्य आहे ते शोधण्याचा त्याने केलेला प्रामाणिक प्रयत्न. ते सत्य गावासमोर यावं हा त्याचा ध्यास भल्याभल्यांना लाजवेल असा होता. वाड्याचे गूढ आज त्याच्यामुळेच तर उलगडले गेले होते. भितीचे सावट दूर झाले होते. त्यामुळे आज तो चर्चेचा विषय बनला तर नवल नव्हते.

एका रात्रीत ‘स्टारडम’ प्राप्त झालेला आपला 'सुपरस्टार' सुमीत.... तो कुठे होता पण? आज आणि पुढचे काही दिवस लाईमलाइइटमध्ये तो असणार होता त्याची सवय तर लावून घेत नव्हता? की यापासून दूर राहू पहात होता?
सुमीत या कशातच नव्हता. तो आत्याच्या घरात तिची सेवा, शुश्रुषा करण्यात गढला होता. रात्री वाड्यात जे काही घडले त्याने बराच अस्वस्थ, विष्ण्ण मनःस्थितीत.

वाड्यात जे रात्री घडलं ते सुमीतकडून ऐकताच आता कसलाही आडपडदा न ठेवता पाटलांनी गेले काही दिवस जे सुरु होते ते गावकर्यांसमोर आणि थोरल्या जमिनदारांना बोलावून त्यांनाही सांगायचे असा निर्णय घेतला. थोरले जमीनदार गावात पोचले. सुमीतला बोलावून आणण्यात आले. पाटलांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसमोर सुमीतचा येथे येण्याचा मनसुबा, आजवर त्या तिघांनी मिळून केलेले कार्य याबद्दल थोडक्यात माहिती दिली आणि सुमीतला रात्री जे घडलं ते सांगण्याबद्दल विनवले. सुमीतने फार काही न बोलता सी सी टी व्ही फूटेज बघायची विनंती केली. लॅपटॉप ऑन केला गेला. रात्री जे काही रेकॉर्ड झालं होतं ते तो दाखवू लागला. जे काही दिसलं, ऐकू आलं ते पाहून, ऐकून सगळे अंतर्बाह्य हादरले.

सुमीत झोपून गेल्यावर बर्‍याच वेळानंतर खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. नीट बघताच एक व्यक्ती खोलीत आल्याचे दिसले. अंधुक प्रकाशात चेहरा, कपडे नीट दिसत नव्हते. पण ती व्यक्ती सराईताप्रमाणे वावरत होती. अचानक त्या व्यक्तीचे लक्ष पलंगावर झोपलेल्या सुमीतकडे गेले आणि.... आणि काय झाले ते कळलेच नाही ती व्यक्ती हिंसक झाल्यागत स्वतः च्या डोक्यावर दोन्ही हात मारुन घेत इथे तिथे पाहू लागली...कसला तरी शोध घेत असल्यासारखी. कॅमेर्‍यात काहीतरी चमकल्याचे जाणवले. ती व्यक्ती त्या दिशेने जाऊ लागली. पलंगाशेजारी साईड टेबलवर पाटील काकांनी ठेवलेला चाकू होता तो. त्या व्यक्तीने चाकू उचलला आणि सुमीतवर वार करणार इतक्यात.....सुमीतला हालचाल जाणवली आणि तो उठला. चपळाईने पलंगावरुन टुणकन उडी मारत त्याने सावध पवित्रा घेतला. झटक्यात त्या व्यक्तीच्या हातातला चाकूही काढून घेतला त्याने. इतक्या सहजतेने चाकू हातातून सोडून दिला याचा अर्थ ती व्यक्ती सराईत गुन्हेगार नव्हती असा कयास सुमीतने बांधला आणि त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करु लागला. आपल्या हातातील शस्त्र काढून घेतल्यामुळे ती व्यक्ती बिथरली आणि सुमीतला ओरबाडू लागली, दोघांची झटापट चालू असतांना सुमीतने त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचे वस्त्र दूर सारले आणि तो जागच्या जागी थिजून गेला..... यापुढे सुरु झाली ती फक्त सुमीतची स्वतःला वाचवण्याची शिकस्त. तो फक्त त्या व्यक्तीचा मार चुकवत होता आणि तिला शांत करु बघत होता. एकदाही त्याने त्या व्यक्तीवर हात उचलला नाही. का असं? कोण होती ती व्यक्ती?

सुमीतला मारत असतानाच ती व्यक्ती संतापून बोलत होती. ते बोलणेही रेकॉर्ड झाले होते.

"अरे चांडाळा? पुन्हा आलास? का ? कशासाठी? माझ्यावर परत अत्याचार करायला? कितीदा सांगितले माझ्या घरात येऊ नकोस. पहिल्या वेळी आलास तेव्हा खरंच अजाण, निरागस वयात होते मी, त्यात एकटी म्हणून डाव साधलास. पण त्यानंतर प्रत्येक रात्र मी जागून काढलेय, सावध रहात. तू पुन्हा आलास माझ्या या घरात, धाकट्या जमिनदाराचं रुप घेऊन? इथे? माझ्या खोलीत? पण मी बेसावध नव्हते बरं. तुला तुझ्याच शस्त्राने मारलं मी. त्यानंतरही हिंमत केलीस? सदा बनून आलास? अरे तेव्हा तर साध्या उशीखाली दाबून फेकून दिले तुला विहीरीत. तेव्हा बजावलं होतं चालता हो, कायमचा निघून जा. तरी आज आलास? बघून घेते तुला. नाही सोडणार जिता. कितीही वेळा आलास तरी नाही सोडणार्,पुन्हा कधीच माझ्या घरात माझ्यावर अत्याचार नाही करुन देणार तुला.”बराच वेळ झटापट करुन गलितगात्र होत शेवटी ती भोवळ येऊन पडली.

सगळं चित्रीकरण समोर बघत असताना सुमीतच्या डोळ्यांतून मात्र अश्रुधारा वाहत होत्या. हे सारं अजाणतेपणी का होईना पण आपली आत्याच करत होती यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. इतरांचीही तशीच काहीशी अवस्था झली होती.

इतक्या रात्री वहिनीसाहेब गावाबाहेरच्या वाड्यात एकट्या आल्या होत्या की कोणा बरोबर? असा प्रश्न उपस्थितांना पडला. पहारेकरी काहीच सांगू शकले नाहीत. त्यांनी वहिनीसाहेबांना किंवा कोणालाच आतमध्ये येतांना पाहिलं नव्हतं. तितक्यात मुकुंदाला रेकॉर्डींग बघत असतांना जे जाणवले होते ते त्याने निदर्शनास आणून दिले. रिवाईंड करत ती व्यक्ती आत येत होती तो भाग पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली.

बेडरुममध्ये आत येण्याचे दार दिवाणखान्यातून होते, जे बंद करुन सुमीत झोपला होता आणि आत्या त्या दारातून आत आलीच नव्हती. तर दुसर्या भिंतीवर जे वाड्याचं पेंटींग होतं ते हलताना दिसत होतं आणि त्यामागूनच आत आलेली दिसत होती. थोरल्या जमीनदारांनी ती जागा पहात आठवून सांगितले की त्यांच्या दोन वाड्यांना जमिनीखालून जोडणारे ते भुयार होते जे त्यांनीच वाडा बांधत असतांना, सुरक्षेच्या दॄष्टीने बांधून घेतले होते. मात्र या गोष्टीची कल्पना फक्त घरातील व्यक्तींनाच होती.

इतकी वर्ष वाड्याबाबतीत असलेले सारे कयास खोटे होते तर. ना तिथे भूत-पिशाच्चबाधा होती ना ते कोणाचे कपट कारस्थान होते.जे काही घडले होते ते अजाणतेपणी अपघातच जणू.

थोरले जमिनदार गावात आत्याला भेटायला गेले सर्वांबरोबर, आत्याच्या घरात. आत्या.... काय घडलंय, घडतंय या सगळ्या आकलनापलिकडे पोचलेली... शुन्यात नजर लावून बसली होती. तिला पहाताच थोरल्या जमीनदारांना गलबलून आले.... इतरांनी त्यांचे सांत्वन केले. कुणीतरी एक कार्ड त्यांच्या हाती सरकवले. ते एक विझिटींग कार्ड होते.... रत्नागिरी शहरातल्या प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञाचे.

थोरल्या जमीनदारांच्या संमतीने सुमीतने त्या मानसोपचारतज्ज्ञाची अपॉइंटमेंट घेतली.स्वतः आत्याला घेऊन तिथे पोचला. सगळी केस हिस्ट्री पाहून आणि प्राथमिक तपासणी करुन डॉक्टरांना ही स्प्लिट पर्सनॅलिटीची केस वाटत होती. आत्याने स्वतः अटॅक आल्यावर बोलून दाखवल्यानुसार लहानपणी तिच्या बाबतीत काही अनुचित घडले असण्याची शक्यता होती, त्या घटनेच्या परिणामस्वरुप जडलेला विकार. नक्की निदान व उपचारपद्धती पुढील अनेक चाचण्यांनंतर ठरणार होती. त्यासाठी आत्याला तिथेच ठेवून घ्यायचे ठरले. जमीनदार साहेबांनी कितीही पैसा तिच्या उपचारांवर खर्च करण्याची तयारी दर्शवली.

सुमीतला झाल्या प्रकाराबद्दल फार अपराधी वाटत होते. आपल्यामुळे हे सारं झालं. ज्या गावात आत्याला इतका मान होता त्याच गावाने आज तिची अशी अवस्था पाहिली. हे गावकरी पुन्हा तिला असा मान देतील का? तिच्या आजाराबद्दल सहानुभुती दाखवत तिच्या हातून अजाणतेपणी घडलेल्या गुन्ह्यांबद्दल तिला माफ करतील का? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. अजुनही बर्याच शंका-कुशंका त्याच्या डोक्यात येत होत्या ज्यावर समाधानकारक उत्तर त्याला मिळत नव्हते. नीट शांतपणे बसून झाल्या घटनाक्रमावर पुनर्विचार करणे त्याला खूप आवश्यक वाटत होते. पण जे झालं ते इतकं अकल्पित आणि अचानकपणे समोर ठाकलं होतं की त्यानंतरच्या सार्या गदारोळात सुमीतला असा शांत वेळ विचार करण्यास मिळालाच नव्हता. त्याची मनःस्थिती ओळखून थोरल्या जमीनदारांनी त्याला समजावले की “तुझ्या या जिज्ञासेमुळेच आपण या प्रकरणाच्या मुळाशी तरी पोचू शकलो. उशीरा का होईना राधेच्या आजाराबद्द्ल समजलं आता उपचार करणं आपल्या हाती.”

हा सारा घटनाक्रम अप्रत्यक्षरित्या त्या वाड्याशीच संबंधित होता. त्यामुळे आता खरंतर थोरल्या देसाईंना या वाड्याचाच उबग आला होता. लेकाचे लग्न करायचे असं घरात ठरवताच त्यांनी हौसेने या वाड्याच्या बांधकामास सुरुवात केली. मात्र वाडा बांधल्यावर एकही दिवस धड ना त्यांचा लेक त्या वाड्यात सुखाने रहू शकला ना सून आणि ना ते स्वतः. त्यामुळे हा असा वाडा आपल्याला नकोच असे विचार त्यांच्या मनात आले. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं सर्वांना. पण खरं तर आता देसाई वाड्याबाबतची संदिग्धता दूर झाली होती. वाडा जणू शापमुक्त झाला होता सुमीतच्या प्रयत्नांमुळे. त्यामुळे हा वाडा गावच्या हिरोला - सुमीतलाच बक्षीस म्हणून देण्यात यावा असा विचार गावकर्यांमधून पुढे आला. मोक्याच्या ठिकाणी असलेला वाडा पुन्हा वहिवाटीत यावा, त्यात माणसांचा राबता रहावा असंच सर्वांना वाटत होतं. तसंही सुमीत वहिनीसाहेबांच्या नात्यातच होता. त्यामुळे त्यांनाही हा प्रस्ताव पसंद पडलाच असता. दुसरं असं की वाडा हस्तांतरीत केल्यामुळे कदाचित वहिनीसाहेबांच्या मनातील ही वाड्याच्या स्वामित्वाची भावना निघून जाऊन झाला तर त्यांच्या उपचारात या गोष्टीचा फायदाच होईल हा विचारही थोरल्या मालकांचा या निर्णयामागे होता. सुमीतला मात्र हे काही नको होतं. त्याचा अपराधीभाव वाडा प्राप्त झाला तर वाढणारच होता. हा वाडा आत्याचा आहे तिच्यासाठीच राहु द्या असं तो गयावया करत विनवू लागला.पण जेव्हा आत्याच्या तब्येतीचा विचार पुढे आला तेव्हा मात्र आत्याला बरे वाटणार असेल तर त्यापरते दुसरे सुख नाही असा विचार करीत सुमीतला यासाठी मान तुकवावी लागली.

गावाने सुमीतचा सत्कार करुन त्याला वाड्याचे कागदपत्र सुपुर्द केले. आता सुमीत घरी जाण्यासाठी निघाला. आत्याशिवाय या गावात राहणे त्याला जड जात होते. मुकुंदा त्याला सोडायला बस स्टँडवर आला होता. त्याला आत्याची चौकशी करायला मध्येमध्ये जात जा असे पुन्हापुन्हा सांगत सुमीत बसमध्ये चढला. आपल्या आयुष्यातील पहिली ‘मिस्ट्री’ सोडवल्याचा आनंद त्याला मुळीच वाटत नव्हता. केवळ आत्याला बरी झालेली त्याला पहायचे होते. मुकुंदाशी बसमधून बोलत असतांना त्याला स्टँडवर एक बाहुल्या विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्या हातात एक नाचणारी बाहुली होती. नीट पाहताच त्याला आढळले की ती कठपुतळी होती. तिच्या दोर्या त्या फेरीवाल्याच्या हातात होत्या. सुमीतच्या डोळ्यांसमोर अचानक त्या बाहुलीच्या जागी आत्या दिसू लागली... आणि तिला नाचवणारा तो स्वतः..... गलबलून आले त्याला.

क्षणात हा विचार झटकत त्याने मुकुंदाला निरोप दिला. बस सुरु झाली. वेगाने गोव्याच्या दिशेने धावू लागली. मात्र ती कठपुतळी काही केल्या सुमीतच्या नजरेसमोरुन हलेना. आपण चुकीचे वागलो ही जाणीव त्याच्या मनाला स्वस्थता देत नव्हती. त्याचे मन थार्‍यावर नव्हते. राहून राहून डोळे भरुन येत होते.

सुमीतने सार्‍या घटनांची मनातच उजळणी केली. आत्याबद्दल , वाड्याबद्दल ऐकीवात असलेल्या सार्या गोष्टी. आजोबा, आत्याचे वडील तर देसाई वाड्यात असायचे आणि आत्या त्यांच्या गावी घारात एकटी, तेव्हाच कोणीतरी तिच्यावर अत्याचार केला असावा का? हे तर सुमीतला कधी कोणी सांगितलेच नव्हते. साहजिकच होते म्हणा. अशा गोष्टी सांगतं का कधी कोणी? आजोबांना माहीत असावं का हे? त्यानंतर आत्याची मनस्थिती कशी असेल? ती उदास, शॉक बसल्यागत आतल्या आत कुढत राहत असावी का? किंवा कदाचित तिला तेव्हाही असे झटके येत असावेत? त्याच दरम्यान कधीतरी तिला मागणी आली असावी देसायांकडून आणि आजोबा हुरळून गेले असावेत. आत्याचं विक्षिप्त वागणं लग्नानंतर तिचा जीवनसाथी मिळाला की ठीक होईल असे वाटून आजोबांनी हे लपवून ठेवले? त्यांचं ही काय चुकलं म्हणा? त्या काळी अशा खेडेगावात कुठे असा मानसिक रोगांबद्द्ल अवेअरनेस होता?

पण मग लग्नानंतर या ज्या दोन मॄत्यूच्या घटना घडल्या त्यानंतर काय झालं असावं? आजोबा तर त्यानंतर काही महिन्यांतच गेले. पण कुणीतरी आत्याच्या वागण्या-बोलण्यावर, राहणीमानावर लक्ष ठेवून होतं का? कुणाला या आजाराचा संशय आला होता का कधी? आत्या अधे मध्ये या भुयारी मार्गातूनच या वाड्यात येत असते. त्या वेळेस जर तिथे कोणी दुसरं असेल तर ती बिथरते आणि हिंसक होते याची कल्पना असावी का कोणाला? या विचारमंथनातून सुमीतला अचानक जाणवलं की आत्या नेमकी त्या रात्रीच कशी काय वाड्यात आली भुयारातून ज्या दिवशी सुमीत तिथे राहिला होता? तिला मुद्दाम तिथे जाण्याबद्दल, तिथे कोणी आहे हे सांगून तिला झटका यावा अशी वातावरणनिर्मिती तर नव्हती केली? तिला असे उघडे पाडण्यासाठी? तिच्या आजाराचा फायदा उचलून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी?

हा विचार मनात येताच अचानक सुमीतला त्या कठपुतळीच्या जागी आत्याऐवजी तो स्वतः दिसू लागला आणि हादरलाच तो.......
नाही नाही.... मी नाही.... मी बाहुला नाहीये... मला नाही कोणीच नाचवत आहे. मी स्वतःहून आलो वाड्याचे गूढ उलगडायला. कोणी जबरदस्ती तर नव्हती केली. त्याने स्वतःचे डोके दोन्ही हातांत गच्च दाबून धरत डोळे मिटून घेतले. पण विचार थोडेच थांबवता येत होते त्याला?

जबरदस्ती नाही केली पण हा धोका पत्करु नकोस असे सांगून विरोधही केला नव्हता ना? या वाड्याबद्दल अंधश्रद्धा आहेत त्या दूर करुन गाव भयमुक्त व्हावे, आत्याला तिच्या घरापासून वंचित केले गेलेय तिला पुन्हा तिचे घर मिळावे असे गाजर दाखवले होतेच ना? सुमीतच्या तर ध्यानी मनी, स्वप्नीही नव्हतं हे असं आत्याच्या आजाराबद्दल. रात्री अचानक अशी आत्या समोर आलेली पाहून तीही अशा हिंसक रुपात हादरलाच सुमीत. पण त्याचं काय? त्याला माहीत असावं का हे सगळं आत्याबद्दल? तिच्या आजाराबद्दल?
आपण तर विश्वासाने इथे घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची खबर त्याला देत होतो. तो निमूटपणे ऐकून फक्त प्रोत्साहन देत होता, हुरुप वाढवत होता. त्या दिवशी एकटे रात्री वाड्यात झोपायला जाणार हे पण आपण कळवले होते त्याला. ओह माय गॉड...मग त्यानेच पाठवलं का आत्याला ? त्या रात्री काही विपरीत घडले असते, मी जागा झालोच नसतो तर.... आत्याच्या हातून तिसरा खून झाला असता.... माझा... हे चाललं असतं त्याला? माझा बळी गेला असता तर? सुमीत भंजाळून गेला विचार करकरुन.
माझा वापर करुन त्याने स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण केली का? कसली? वाडा हडप करण्याची? मला अंधारात ठेवून?. एकाएकी सुमीतला आपण एका मोठ्या षडयंत्राचा भाग झालोय, फसवले गेलोय हे जाणवू लागले. केवळ त्याला असलेल्या रहस्य उलगडण्याच्या आवडीमुळे?

आणि ही आवड? ओह.. हा देखील या षडयंत्राचा भाग तर नव्हता? रहस्य कथांची आवड माझ्यात जोपासण्याचा? रहस्य कथांची पुस्तके, सिनेमे मला मिळतील याची तजवीज करण्याचा? एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टीव्हीटी म्हणून कराटेचीच निवड करणे हाही?

सुमीतला गरगरु लागले. त्या बाहुलीच्या गळ्यातील दोर्‍या आपल्या गळ्याभोवती आवळल्या जातायत नि आपला श्वास घुसमटतोय असे वाटू लागले त्याला. पण आता सगळं होऊन गेलं होतं. आता काय उपयोग हे सगळं समजून? या गाडीला रिव्हर्स गियर नव्हताच. ब्रेक दाबूनही काही फायदा झाला नसता. आता केवळ अॅक्सलरेटर दाबत पुढे जात रहाणे हेच हातात होते. जे झालं ते झालं पण यापुढे मीच सारी सुत्रे हातात घेणार त्याला कठपुतळी बनवून. पण असा छुपा वार नाही करणार त्याला सांगूनच करणार. मीच असणार यापुढे मास्टरमाईंड.

मनाशी निश्चय करत सुमीतने खिशातून फोन बाहेर काढला, नंबर डायल केला. फोन उचलला गेल्यावर सुमीत बोलला, "तुमचं मिशन फत्ते करुन मी येतोय..........बाबा !!"

समाप्त

Keywords: 

लेख: