आता आमच्या दोघींचे काय? पण हरून बसेल ती आई कसली. शिलाई तर ती करतच होती तशातच कारखाना सुरू ठेवायचा निर्णय तिने घेतला. कच्चा माल शिल्लक होताच. ती कधीही घराबाहेर पडली नव्हती. तरी दादांना ती प्रत्येक गोष्ट विचारून घ्यायची. मला वाटते त्यामुळेच दादा गेल्यानंतर ती कारखाना चालवताना काही डगमगली नव्हती. शिल्लक होता त्या मालापासून तिने परत मिश्री च्या पुड्या तयार केल्या. आणि अण्णाला सांगितले दुकानदारांना पोहोच करायला. पुण्याला पण तिने माल पाठवला. कच्चा माल मागविण्यासाठी ड्राफ्ट वगैरे काढून कसा पाठवायचा ते विचारायला ती घरमालकांच्या आप्पांकडे गेली.
माझे दादा कुठेही बाहेर निघाले की मला बरोबर घेऊन जात. सगळ्यांना सांगत हे आमचे शेंडेफळ म्हणून. माझ्या इतका त्यांचा सहवास माझ्या कोणत्याच भावंडांना मिळाला नाही. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा माझे दादा 1942 च्या लढ्यात उतरले होते. त्यामुळे सतत त्या कामात आणि जेलमध्ये असायचे. मला वाटते दादांची पण मुलांबरोबर राहायची हौस राहिली असेल त्यामुळे ते माझे खूप लाड करत, असे आता मला वाटते. विशेष म्हणजे माझ्या कोणत्याच भावंडांनी त्याबाबत माझा राग राग केला नाही. उलट त्यांनीही माझे लाडच केले. मला वाटते ते सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे असेल.
मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. तेव्हा आम्हाला शाळेने कराड मधील मुतालिक वाडा आहे तिथे नेले होते. तिथे एक जण आम्हाला मुलांना गोष्ट सांगत होते.,'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'. तर ते गृहस्थ मला खूप आवडले. त्यानंतर ते एक दिवस चाळीतील कुणाकडे तरी आले होते, मी त्यांना कुठे पाहिले हे विसरून गेले होते. मी तिथेच खेळत होते. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर का कुणास ठाऊक मला वाटले की हे माझ्या दादांचे मित्र आहेत. त्यामुळे मी दोन-तीनदा त्यांना म्हणाले की माझे दादा घरी आहेत. त्यांनाही वाटले कोण हिचा दादा आहे बघूया. मला म्हणाले चल तुझ्या दादांकडे.
माझ्या आईने तिच्या बालपणापासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि त्या इथे सगळ्यांसोबत शेअर करायला मला परवानगी दिली आहे. भाग एक टाकला आहे. मैत्रिणींना वाचायला आवडल्या तर पुढचे भाग टाकेन.
सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!!
सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते..